अपघातांची कारणे शोधून सखोल चौकशी आवश्यक - आरटीओ
By सुमेध वाघमार | Published: January 16, 2024 07:02 PM2024-01-16T19:02:32+5:302024-01-16T19:03:04+5:30
आरटीओ : ‘रस्ता सुरक्षा अभियान’ला सुरुवात
सुमेध वाघमारे
नागपूर : अपघातांची संख्या कमी करावयाची असल्यास त्यांचा अभ्यास करून कारणे शोधणे व सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपघातपूर्व स्थितीची पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. अपघाताचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याकरिता अपघातासंबंधी माहिती एकसारखी व अचूक संकलित करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन पुणे येथील ‘परिसर’संस्थेच्या पदाधिकाºयांनी केले.
परिवहन आयुक्त कार्यालयाचा निर्देशानुसार १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान नागपूर शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि पूर्व नागपूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान’ाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमधील सदस्यांसाठी शास्त्रोक्त पध्दतीने अपघातांचे शास्त्रशुध्द विश्लेषण, रस्ता सुरक्षा संदर्भातील जिल्हयातील एकूण स्थिती, रस्ते अपघात कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत ‘परिसर’ संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी संदिप गायकवाड व शहर रस्ता सुरक्षा समन्वय अधिकारी सुशिल पाठारे यांनी रस्ता सुरक्षा समितीमधील सदस्यांना रस्ते अपघात कसे कमी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार, राजेश सरक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके , अशफाक अहमद, राजन पाली, नितीन पालांगे, जयश्री लोखंडे, रविंद्र बुंधाडे, अ. अ. कुचेवार, एम. लांजेवार, अविनाश गोंड, श्याम तिवसकर, श्रीराम पारसे, अमित कलोरे आदी उपस्थित होते.