बालदिनाची गंमतच न्यारी...

By admin | Published: November 14, 2014 12:49 AM2014-11-14T00:49:14+5:302014-11-14T00:49:14+5:30

बालदिन म्हटले की क्या कहने! घराघरातील चिंटू, पिंटू अन् बच्चे कंपनीच्या उत्साहाला पारावार उरत नाही. काळ बदलल्यावर पिढीदेखील बदलते, असे म्हणतात. कालच्या पिढीला क्वचितच

Baldina's fun game ... | बालदिनाची गंमतच न्यारी...

बालदिनाची गंमतच न्यारी...

Next

बच्चे कंपनीमध्ये उत्साह कायम : पारंपरिक समारंभांना आधुनिकतेचा साज
नागपूर : बालदिन म्हटले की क्या कहने! घराघरातील चिंटू, पिंटू अन् बच्चे कंपनीच्या उत्साहाला पारावार उरत नाही. काळ बदलल्यावर पिढीदेखील बदलते, असे म्हणतात. कालच्या पिढीला क्वचितच मिळणाऱ्या गोष्टी आजच्या चिमुकल्यांना अगदी सहजतेने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे असे ‘दिवस’ फारसे महत्त्वाचे राहिले नाही, अशी टीका वारंवार करण्यात येते. परंतु जुन्या पिढीने अनुभवलेला तोच आनंद आजच्या ‘हायटेक’ बालकांच्या चेहऱ्यावरदेखील अनुभवायला मिळतो. प्रत्यक्षात पाहिले नसले तरी आजही बालकांना ‘चाचा नेहरू’ जवळचे अन् हक्काचे वाटतात. १४ नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याच्या पद्धतीत जरी आमूलाग्र बदल होत असले तरी उत्साह अन् त्यातील गाभा मात्र आजही कायम आहे. उपराजधानीच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला बालदिन म्हणजे स्वत:च्या हक्काचा दिवस आहे याची जाणीव आहे.
एक काळ होता जेव्हा ‘बालदिन’ येण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पहायचे. एरवी रागावणारे शिक्षक, पालक यादिवशी विद्यार्थ्यांशी अगदी शांतपणे बोलायचे. शिवाय ज्या हातांनी धपाटे घातले जायचे, त्यांच्याकडूनच खाऊ मिळायचा. त्यामुळे बालदिनाच्या तयारीत बच्चे कंपनी मनापासून गुंतायची. काळ बदलला, अन् शिक्षणपद्धतीदेखील. आता धपाटे तर दूरच राहिले विद्यार्थ्यांना साधे रागवतानादेखील शिक्षकांना चार वेळा विचार करावा लागतो. जुन्या काळातील खाऊ तर कधीच ‘आऊटडेटेड’ झाला आहे. आता तर तोंडातून शब्द काढायचा अवकाश, की काही क्षणांतच हवी ती गोष्ट मिळण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. परंतु इतके असले तरी बालदिन म्हणजे बालकांच्या हक्काचाच दिवस. त्यामुळे बदललेल्या स्वरूपातदेखील त्याच उत्साहात हा दिवस साजरा होतो.
विद्यार्थ्यांची विधायक मानसिकता
मागील पिढीपेक्षा आताच्या पिढीतील बालके जास्त ‘शार्प’ असल्याचे म्हटल्या जाते. एखादा दिवसाचा इतिहास त्यांना एखादे वेळी माहीत नसेल, परंतु त्यातील भावना मात्र ते नक्कीच जाणतात. आपल्या हक्काचाच दिवस म्हटल्यावर ते त्याला आणखी संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करतात. वंचित बालकांसाठी मदत गोळा करण्याचा विचार याच विद्यार्थ्यांच्या डोक्यातून येतो अन् ते त्यावर झटपट कामालादेखील लागतात. शहरातील निरनिराळ्या शाळांमधून हे चित्र पहायला मिळत आहे. अगदी घरीदेखील एकट्याने हा दिवस साजरा न करता ‘ग्रुप’मध्ये एकत्र येऊन बच्चे कंपनी धम्माल करताना दिसून येते. (प्रतिनिधी)
चिमुकल्यांचे भावविश्व विस्तारतेय
मुळात आजची ‘जनरेशन’ वेगवान आहे. शिवाय बदलत्या काळात विचारांमध्येदेखील बदल दिसून येत आहेत. एखादा दिवस साजरा करायचा म्हणजे त्याचे ‘प्लॅनिंग’ यांच्या डोक्यात अगोदरपासूनच सुरू होते. शिवाय मदतीला अत्याधुनिक तंत्रज्ञान व निरनिराळी ‘गॅजेट्स’ आहेतच. घरूनदेखील सहकार्य मिळते. यामुळे चिमुकल्यांचे भावविश्व विस्तारत आहेत. लहान लहान गोष्टींचा आनंद घेण्याची पद्धतदेखील बदलत आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अभिषेक मामेर्डे यांनी व्यक्त केले.
शहरांतील शाळांमध्ये ‘फुल्ल आॅन’ उत्साह
शुक्रवारी होणाऱ्या बालदिनासाठी शहरातील शाळांमध्ये निरनिराळे उपक्रम घेण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला आदरांजली तर वाहण्यात येणारच आहे. शिवाय कथाकथन, चित्रकला स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा असे उपक्रम तर आहेतच. परंतु यासोबतच कुठे ‘सायंटिफिक स्लोगन’ कुठे चक्क ‘एसएमएस’वर शुभेच्छा देण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. काही शाळांतर्फे विज्ञानविषयक माहितींचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Web Title: Baldina's fun game ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.