एसीबीने पकडला दलाल
By admin | Published: January 6, 2015 01:06 AM2015-01-06T01:06:44+5:302015-01-06T01:06:44+5:30
कोर्टातून निघालेला वॉरंट थांबवतो आणि पुढील कारवाईसुद्धा निस्तरतो, असे सांगून पाच हजारांची लाच मागणाऱ्या एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रात्री अटक केली.
पाच हजारांची लाच स्वीकारली
नागपूर : कोर्टातून निघालेला वॉरंट थांबवतो आणि पुढील कारवाईसुद्धा निस्तरतो, असे सांगून पाच हजारांची लाच मागणाऱ्या एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रात्री अटक केली.
अमर मन्नूलाल गौर (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. तो यशोधरानगरातील पांडे मोहल्ल्यात राहतो. तक्रारकर्ते वासुदेव वैरागडे हे ट्रॅव्हल एजंट आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची सुमो विकली. मात्र, त्याचे कागदोपत्री नोंद झाली नाही. वैरागडे यांच्या नावावर असलेल्या या सुमोचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने सुमो मालकाच्या नावे न्यायालयातून वॉरंट काढला. आरोपी गौर हा कोर्टाच्या परिसरात दलालीचे काम करतो. त्याने लगेच वैरागडे यांच्याशी संपर्क साधला. वॉरंटची तारीख वाढवून प्रकरण निकाली काढण्यासाठी पाच हजार रुपये पाहिजे, असे गौर म्हणाला. त्याने ही रक्कम कोर्टातील लोकांकरिता लाच म्हणून मागितली.
प्रारंभी त्याने आपण कोर्टात लिपिक असल्याचेही सांगितले. प्रत्यक्षात तो कोर्टाचा कर्मचारी नसल्याची माहिती मिळाल्यामुळे वैरागडे यांनी एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळ्याचे आयोजन करण्यात आले. संपर्काअंती गौर याने लाचेची रक्कम घेऊन वैरागडेंना पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकात बोलावले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ६.३० वाजता वैरागडे तेथे पोहोचले. त्यांच्याकडून लाचेचे पाच हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, हवालदार विलास खणके, नायक अजय यादव, चंद्रनाग ताकसांडे, चंद्रशेखर ढोक, मनोहर डोईफोडे यांनी आरोपी अमर गौरच्या मुसक्या बांधल्या. (प्रतिनिधी)