चतुर्वेदी घरून शिवसेनेचा कारभार चालवितात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:22+5:302021-09-02T04:18:22+5:30
नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड ...
नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. शेवटी तक्रारींची दखल घेत शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी बुधवारी दोन्ही गटाची आमोरासमोर बैठक घेतली. या बैठकीतही नाराज गटाने चतुर्वेदी यांच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली. ते पक्ष कार्यालयाऐवजी घरूनच चालवित असल्याची तक्रार केली. याची दखल घेत देसाई यांनी पक्ष कार्यालयातूनच कारभार करण्याच्या सूचना चतुर्वेदी यांना दिल्या. तसेच नाराज गटालाही पक्षविरोधी भूमिका न घेण्याची ताकीद देण्यात आली.
माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्याची गंभीर दखल मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. ही संधी साधत माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे, माजी महापौर किशोर कुमेरिया, माजी शहर प्रमुख सुरज गोजे, राजू कनोजिया, जगतराम सिन्हा, बालू मगरे यांनी अनिल देसाई यांच्याकडे चतुर्वेदींच्या कारभाराबाबत तक्रार केली. देसाई यांनी असंतुष्टांना बुधवारी मुंबईत बोलावून घेतले. देसाई यांच्याकडून निरोप मिळताच दुष्यंत चतुर्वेदी हे देखील महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कासपे, मंगला गवरे आदींना घेऊन पोहोचले. खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत देसाई यांनी या सर्वांची बैठक घेतली.
बैठकीत किशोर कुमेरिया, कनोजिया, गोजे यांनी शिवसेनेची बैठक पक्ष कार्यालयात न घेता चतुर्वेदी यांच्या घरी होत असल्याची तक्रार केली. आता काँग्रेसच्या घरातून शिवसेना चालवायची का, असा सवाल त्यांनी केला. शहर कार्यकारिणीत तसेच जिल्हास्तरीय शासकीय समित्यांवर
काँग्रेसमधून आलेल्यांना स्थान देण्यात आले असून, जुने पदाधकारी, माजी नगरसेवक यांना संधीच देण्यात आली नसल्याचेही सांगितले. असे सुरू राहिले तर नागपुरात शिवसेनेला गळती लागेल, असा धोका त्यांनी वर्तविला. कनोजिया यांनी तर नितीन तिवारी यांच्यावर वसुलीचे आरोप केले. दिवाकर रावते ज्यांना पक्षातून काढणार होते, त्यांना चतुर्वेदी यांनी शहर प्रमुख बनविले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर तिवारी यांनी आरोप फेटाळत चतुर्वेदी यांची बाजू भक्कमपणे मांडली. भाजपच्या घोटाळ्यांविरोधात आपण आंदोलने करून आवाज उठविल्याचेही त्यांनी सांगितले. कुमेरिया, हरडे यांनी शहरात दोन महानगर प्रमुख करण्याची मागणी केली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर देसाई यांनी नाराज गटालादेखील पक्षाचे नुकसान होईल, अशी भूमिका घेऊ नका, असे बजावले.