गटबाजीत काँग्रेसची कोंडी

By admin | Published: February 25, 2017 02:00 AM2017-02-25T02:00:49+5:302017-02-25T02:00:49+5:30

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत दहा वर्षापासून भाजपच्या ताब्यात असलेली

Congress stumbling block | गटबाजीत काँग्रेसची कोंडी

गटबाजीत काँग्रेसची कोंडी

Next

४१ जागांचा आकडा २९ वर आला : आपसातील वादात नियोजन चुकले
नागपूर : गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत दहा वर्षापासून भाजपच्या ताब्यात असलेली नागपूर महापालिका काबीज करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न होते. परंतु काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांतील अंतर्गत गटबाजीमुळे महापालिका काबीज करणे तर दूरच काँग्रेसची घसरगुंडी झाल्याने महापालिकेतील काँग्रेस सदस्यांचा आकडा ४१ वरून २९ पर्यत खाली घसरला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा न घेता एकमेक ांचे पाय ओढण्याच्या प्रवृत्तीमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला आहे. नागपुरात कॉंग्रेसनेच काँग्रेसला पराभूत केले आहे. आपसातील अंतर्गत कलहामुळे भाजपचे आव्हान व बसपाची घुसखोरी रोखण्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतरही काँग्रेसच्या स्थानिक संघटनेत वरपासून तर खालपर्यत बदल न केल्यास भविष्यात शहर काँग्रेसला दैवी चमत्कारच वाचवू शकेल.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रभाग पिंजून काढत होते. मात्र पक्षातील नेते काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार नाही यासाठी मोर्चेबांधणी करीत होते. यामुळे काँग्रेसला जेमतेम २९ जागा जिंकता आल्या. भाजपने मात्र १०८ जागा जिंकत नवा विक्रम प्रस्थापित करून सत्तेची हॅट्ट्रिक साधली. बसपाने १० जागा जिंकून आपली मते कायम ठेवली. एवढेच नव्हे तर काही प्रभागात त्यांनी काँग्रेसची मते आपल्या बाजूने खेचली.
महापालिकेच्या सलग दोन निवडणुका तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांनी यातून कोणताही धडा घेतलेला नाही. आपसात भांडत असतानाच मतदारांना मात्र सर्व नेते एकत्र असल्याचा भास निर्माण करण्यात आला. माजी मंत्री सतीश सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत व माजी खा. विलास मुत्तेमवार एकत्र विदेश दौऱ्यावर गेले होते. सोबतच त्यांनी ‘मॉर्निग वॉक’ सुरू करून आपसातील मतभेद मिटल्याचा संदेश कार्यक र्त्यांना दिला होता. परंतु शहर कार्यकारिणीत आपल्या समर्थकांना स्थान न दिल्याचा मुद्दा पुढे करून नितीन राऊ त व सतीश चतुर्वेदी यांनी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधात आघाडी उघडली. दुसरीकडे विलास मुत्तेमवार यांच्या गटानेही पक्षाला डुबवण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही.



गटबाजीत काँग्रेसची कोंडी


शहर काँग्रेस विलास मुत्तेमवार-विकास ठाकरे व चतुर्वेदी -राऊ त यांच्या गटात विभागली आहे. याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीत आला. त्यामुळे उमेदवारांची निवड करण्यासाठी निवड समितीची नियुक्ती करता आली नाही. उमेदवार ठरविण्यासाठी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सतीश चतुर्वेदी व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यात वाद झाला. प्रभाग क्रमांक ३८ मधील उमेदवारीवर विकास ठाकरे व प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी दावा केल्याने काँग्रेस दोन गटात विभागली गेली.
यामुळे काँग्रेसला महापालिका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. गटबाजीतूनच हसनबाग येथील प्रचार सभेत पक्षाच्या एका नेत्याच्या इशाऱ्यावरून अशोक चव्हाण यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. काळ्या शाईचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर स्पष्ट दिसून आला.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर नागपुरात भाजपला १३ जागा मिळाल्या तर बसपाने १० जागा बळकावत दुसरे स्थान मिळविले. परंतु प्रभाग क्रमांक २ मध्ये चारही जागा जिंकून ज्या ठिकाणी गटबाजी नाही. अशा ठिकाणी काँग्रेसचा विजय कुणालाही रोखता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य नागपुरात युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांनी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या महाल भागातून विजय मिळवून पक्षाला दिलासा दिला. तसेच प्रभाग क्रमांक ५ मधून सर्व चारही जागा जिंकून काँग्रेसला अल्पसंख्यक समाजाचा जनाधार असल्याचे स्पष्ट केले आहे. हलबा समाजाचे प्राबल्य असलेल्या प्रभागातून विजय मिळवून रमेश पुणेकर यांनी पंजाला मजबूत केले आहे. मात्र इतर उमेदवार असा चमत्कार करू शकले नाही. मध्य नागपुरात माजी मंत्री अनिस अहमद प्रयत्न करीत होते. परंतु पक्षाच्या इतर नेत्यांची त्यांना मदत मिळाली नाही.
काँग्रेसला सर्वाधिक फटका दक्षिण व पूर्व नागपुरात बसला. दक्षिणमध्ये संजय महाकाळकर व मनोज गावंडे यांनी पक्षाची लाज राखली. काँग्रेस बंडखोर दीपक कापसे अपक्ष म्हणून मैदानात होते. ते स्वत: जिंकू शकले नाही. परंतु प्रभागातील इतर उमेदवारांना पराभूत करण्यात त्यांची मदत झाली.
दक्षिण-पश्चिम नागपुरातील गटबाजीचा फटका शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना बसला. प्रभाग ३७ मधून विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. पश्चिम नागपुरात बोटावर मोजण्याइतकेच पक्षाचे उमेदवार निवडून आले.

पराभवातून धडा
घेतला नाही
महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतरही यातून काँग्रेस नेत्यांनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. माजी मंत्री नितीन राऊ त यांनी पराभवाला स्थानिक नेत्यासोबत प्रदेश नेतृत्व जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांचा इशारा माजी खा. विलास मुत्तेमवार यांच्याकडे होता. त्यामुळे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे यांनाही राऊ त यांनी जबाबदार धरले आहे. दुसरीकडे विलास मुत्तेमवार यांनी या प्रकरणाची प्रदेश काँग्रेसने चौकशी करून दोषी असऱ्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी करून यातून सत्य परिस्थिती पुढे येईल, असा दावा केला आहे.

Web Title: Congress stumbling block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.