गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
By admin | Published: January 11, 2015 12:51 AM2015-01-11T00:51:58+5:302015-01-11T00:51:58+5:30
पोलिसांच्या सदोष तपासामुळे अनेकदा पुरावा असूनही गुन्हेगार सुटतात. महाराष्ट्रात आरोपी सुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब असून गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, असे प्रतिपादन
उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन : जीवनगौरव पुरस्कार प्रदान
नागपूर : पोलिसांच्या सदोष तपासामुळे अनेकदा पुरावा असूनही गुन्हेगार सुटतात. महाराष्ट्रात आरोपी सुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब असून गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, असे प्रतिपादन सुविख्यात कायदेपंडित अॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी केले.
त्यांना पद्मगंधा प्रतिष्ठानचा २०१५ या वर्षाचा नलिनी बाळकृष्ण पुरस्कृत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सायंटिफिक सभागृहात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे , उद्घाटक वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, प्रमुख वक्ते व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती किशोर रोही, प्राचार्य बाबूराव देसाई, प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष शुभांगी भडभडे, नलिनी बाळकृष्ण देवपुजारी आदी व्यासपीठावरील मान्यवरांनी निकम यांना सन्मानाने हा पुरस्कार प्रदान केला. मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निकम म्हणाले, वर्षानुवर्षे न्यायालयात खटल्याची सुनावणी होत नाही. शीघ्र गती न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयाचे निकाल का लागत नाही? राज्याची सुबत्ता ही सर्वसामान्यांचा न्यायालयावरील विश्वासावर अवलंबून असते. कायदा व सुव्यवस्था नांदायची असेल तर यासाठी कायद्याचे पुजारी होणे गरजेचे आहे. अर्थातच यात न्यायाधीशांवर मोठी जबाबदारी आहे. न्यायालयाच्या निर्णयाची जनसामान्यात काय प्रतिक्रि या आहे यासाठी त्यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील महत्त्वाच्या खटल्यांची माहिती दिली. राज्यात आरोपी सुटण्याचे प्रमाण अधिक आहे, ते कमी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. या संदर्भात त्यांनी चर्चा केली. नंतर या संंदर्भातील फाईल अवलोकनासाठी पाठविली. २६/११ चा हल्ला दहशतवादी हल्ला हा पाक पुरस्कृतच होता. त्यांना भारताविरुद्ध अघोषित युद्ध पुकारावयाचे होते. जीवनगौरव पुरस्कार त्यांचे वडील दादासाहेब निकम यांना समर्पित करून त्यांच्या शिकवणीतूनच मी घडलो आहे. सामान्य माणूस हीच आपली खरी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे प्रत्येकाचा कायद्याशी संबंध येतो. एकवेळ दोषी सुटला तर चालेल पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये हे कायद्याचे तत्त्व आहे. परंतु या तत्त्वाचा गुन्हेगार गैरफायदा घेत असल्याने यावर विचार करण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले.
डॉ. पंकज चांदे, डॉ. बाबुराव देसाई, गिरीश गांधी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. शुभांगी भडभडे यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. संचालन प्रभा देऊ स्कर यांनी केले.(प्रतिनिधी)
कसाबला बिर्यानी दिली जात नव्हती!
कमी वयात कसाब दहशतवादी कसा झाला याची माहिती जाणून घेण्यासाठी न्यायालयात त्याच्याशी चर्चा करीत होतो तेव्हा त्याने डोळे चोळले. परंतु काही वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी कसाबच्या डोळ्यात पाणी आल्याची ब्रेकिंग न्यूज प्रकाशित केली. सुनावणीनंतर न्यायालयातून बाहेर पडल्यावर वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मला गराडा घातला. कसाबबाबत प्रश्न विचारू लागले. तेव्हा थट्टेने कसाबला मटन बिर्यानी हवी आहे, असे म्हणालो. वास्तविक त्याला ती कारागृहात पुरवली जात नव्हती, असा गौप्यस्फोट निकम यांनी केला.