प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली की संस्कृतीचा ऱ्हास होतो
By Admin | Published: January 13, 2015 01:03 AM2015-01-13T01:03:32+5:302015-01-13T01:03:32+5:30
प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे याला विकास म्हणतात. आज चंगळवाद व सुधारणेच्या नावाखाली प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकृतीचा ऱ्हास होत आहे. यासाठी नीतीचे बंध घालणे
भरतबुवा रामदासी : नीतीचे बंध घालणे आवश्यक
नागपूर : प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे याला विकास म्हणतात. आज चंगळवाद व सुधारणेच्या नावाखाली प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकृतीचा ऱ्हास होत आहे. यासाठी नीतीचे बंध घालणे आवश्यक असल्याचे विचार ह.भ.प. भरतबुवा रामदासी महाराज यांनी केले.
कीर्तन महोत्सव आयोजन समिती व राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने चिटणीस पार्कवर सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाचे चौथे पुष्प त्यांनी गुंफले. त्यांचा कीर्तनाचा विषय देव, देश आणि धर्मावर नितांत प्रेम करणाऱ्या राजे संभाजी महाराज हा होता. आपल्या कीर्तनात त्यांनी विकृती आणि संस्कृतीतील तुलना केली. विकृती जीवन बिघडविते तर संस्कृती जीवन घडविते. विकृती देवाला दगड तर संस्कृती दगडाला देव बनविते. आज सुधारणेच्या नावाखाली संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. प्रगती ही जगण्याला आवश्यक आहे. पण ती नैतिक मूल्याच्या अधिष्ठानावर असायला पाहिजे.
जगाकडे बघितल्यानंतर लक्षात येते की, हे संपूर्ण जग अपूर्णतेने ग्रासलेले, विसंगतीने माखलेले, संघर्षानी फाटलेले, दुभंगलेले, विनाशाने ओढवलेले आहे. मानवी जीवनाची उत्क्रांती करायची असेल तर धर्माची नितांत गरज आहे. धर्माचे चिंतन मांडताना भरतबुवा म्हणाले, धर्म ही जीवनपद्धती आहे. प्रत्येक धर्मात तत्त्वमीमांसा, आचारसंहिता असते.
हे सर्व विसरून आंधळी कवायत करण्याकडे माणसाचा कल दिसून येत आहे. संभाजी राजांनी देश, देव व धर्मावर नितांत प्रेम केले. त्यासाठी बलिदान दिले. धर्माने कधीही द्वेष, मत्सर शिकविला नाही. धर्म सांगतो आपापले कर्म परमेश्वराला आवडेल असे करा. आज कीर्तन महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी छोटे बालकदास महाराज, आ. मिलिंद माने, उद्योजक विलास काळे उपस्थित होते. आजची आरती रवींद्र भोयर व मदन अडकिने यांच्याहस्ते झाली. (प्रतिनिधी)