अफवा पसरवू नका, ‘बर्ड फ्लू’ची बाधा माणसांना होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:07 AM2021-01-18T04:07:46+5:302021-01-18T04:07:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बर्ड फ्लूमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही. समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बर्ड फ्लूमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही. समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्यांना पारितोषिक दिले जाईल, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री सुनील केदार यांनी रविवारी येथे केले.
शेतकरी भवन येथे विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजा दुधबडे, सचिव डॉ. गजानन वानखेडे, सहसचिव हुसेन शेख, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र राऊत, तसेच शेतकरी प्रतिनिधी डॉ. पिंकी इंगेवार, प्रेमचंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.
बर्ड फ्लू विषाणूची बाधा मानवाला होत नाही. यासाठी चिकन तसेच अंडी सेवन करताना भीती बाळगू नका. कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा जोडधंदा आहे. चिकन तसेच अंडी यामध्ये कोणतीही भेसळ राहत नाही. शिवाय यामध्ये मोठया प्रमाणात प्रथिने असतात. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्याला रोख बक्षीस देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.