विचारांची लढाई विचारांनीच लढावी
By admin | Published: January 13, 2015 01:08 AM2015-01-13T01:08:15+5:302015-01-13T01:08:15+5:30
विचारांची लढाई ही विचारांनीच लढावी. हिंसेने लढू नये. जे कमजोर असतात तेच विचारांची लढाई हिंसेने लढतात आणि त्यातूनच पॅरिससारख्या घटना घडतात, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय
राम माधव : आपली परंपरा ही जीवनदृष्टी
नागपूर : विचारांची लढाई ही विचारांनीच लढावी. हिंसेने लढू नये. जे कमजोर असतात तेच विचारांची लढाई हिंसेने लढतात आणि त्यातूनच पॅरिससारख्या घटना घडतात, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी येथे केले. चित्रपटगृहाला पेटवून प्रश्न सुटणार नाही. एखाद्याने आपल्या विरोधात एखादा चित्रपट काढला असेल तर तुम्ही चार चित्रपट काढून त्याला उत्तर द्या. एखाद्याच्या टीकात्मक लेखाला आणखी चार लेख लिहून उत्तर द्या, असे आवाहन करीत या देशातील बुद्धिजीवी लोकांनीसुद्धा यासंबंधात दुतोंडी भूमिका बजावू नये, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्था मर्या.तर्फे सोमवारी सायंकाळी गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात विवेकानंदांचे सामाजिक विचार या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर संस्थेचे अध्यक्ष सुधीर दप्तरी, सचिव चंद्रकांत लाखे, सहसचिव अशोक हरदास, उपाध्यक्ष महेश अंधारे व्यासपीठावर होते. राम माधव म्हणाले, आमच्या देशाला प्राचीन परंपरेचा वारसा लाभलेला आहे. आमची परंपरा ही जीवनपद्धत नसून जीवनदृष्टी आहे. ती सार्वकालीन आहे. या देशात अनेक पूजापद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. परंतु त्या सर्वांची जीवनदृष्टी एकच होती. ही जीवनदृष्टी घेऊनच स्वामी विवेकानंद जागतिक धर्म परिषदेला गेले होते. तिथे त्यांनी सांगितले की, मी त्या देशातून आलो आहे, ज्या देशात सर्व विचारांचा आदर केला जातो. विविधतेचा उत्सव साजरा केला जातो. ही आपली शक्ती आहे.
स्वामी विवेकानंदानीसुद्धा म्हटले होते की, आपला धर्म महान आहे, परंतु व्यवहार अनुकूल नाही. हा व्यवहार बदलण्याची गरज आहे. परिवर्तनाची व्यवस्था आमच्यात आहे. जुनी व्यवस्था बदलावी, नवीन व्यवस्था यावी. परंतु हा बदल घडवून आणत असताना संवेदनशीलता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
प्रास्ताविक विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेचे अध्यक्ष सुधीर दप्तरी यांनी केले. सोनाली जोगळेकर यांनी संचालन केले. नेहा दप्तरी यांनी वंदे मातरम् सादर करीत कार्यक्रमाची सांगता केली. (प्रतिनिधी)