शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
By admin | Published: February 24, 2016 03:22 AM2016-02-24T03:22:29+5:302016-02-24T03:22:29+5:30
राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. कापूस आणि सोयाबीनला सरकारने दिलेला हमीभाव उत्पादन खर्चाइतकाही नाही.
निरंजन डावखरे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा
विभागीय कार्यालयावर मोर्चा
नागपूर : राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. कापूस आणि सोयाबीनला सरकारने दिलेला हमीभाव उत्पादन खर्चाइतकाही नाही. दुष्काळाच्या परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ठोस व भरीव मदत करण्यासाठी शासनाने येत्या बजेट अधिवेशनात शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केली. अन्यथा राज्यभर आक्रमक आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही दिला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, नुकसानग्रस्त सोयाबीन, कापुस, धान व संत्रा पिकाला भरपाई देण्यात यावी, एपीएल कार्डवरील धान्य त्वरीत सुरू करावे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती सुरू कराव्या, नागपूर शहरातील झोपडपट्टी धारकांना मालकीचे पट्टे देण्यात यावे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय मोर्चाचे आयोजन मंगळवारी प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या मोर्चात आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सलील देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, पंकज बोराडे, शैलेश मोहिते, आशिष नाईक, विलास झोडापे, संदीप कीटे, मुनाफ शेख, रिंकु पापडकर, किशोर तरोणे, नगरसेवक राजू नागुलवार, वेदप्रकाश आर्य, प्रवीण कुंटे, ईश्वर बाळबुधे, विशाल खांडेकर, वर्षा शामकुळे, रिजवान अन्सारी, रविकांत वरपे, राजेंद्र बढिये, साहिल सय्यद यांच्यासह नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधान चौकात छोटेखानी सभा पार पाडल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सभेत आ. प्रकाश गजभिये यांनी सरकारवर ताशेरे ओढत हे सरकार विकासाच्या नावावर शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप केला. प्रवक्ता अतुल लोंढे यांनी हे सरकार उद्योगपतींना तारणारे आणि शेतकऱ्यांना मारणारे असल्याचा आरोप केला. गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, कापूस व धानाला भाव मिळालाच पाहिज, रोजगाराची संधी, संत्र्याला भाव या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मोर्चा दरम्यान केल्या. मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने विभागीय उपायुक्त अप्पासाहेब धुळास यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.