पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘ट्रान्सफर सिस्टिम’चे गौडबंगाल उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:52+5:302021-09-02T04:17:52+5:30
- भूमाफियाशी निगडित अधिकाऱ्याची बदली : सहा महिन्यापासून होता आजारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काही दिवसापूर्वी शहरात तैनात ...
- भूमाफियाशी निगडित अधिकाऱ्याची बदली : सहा महिन्यापासून होता आजारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही दिवसापूर्वी शहरात तैनात असलेले पीआय, एपीआय, पीएसआय दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. परंतु, एका अधिकाऱ्याच्या बदलीने पोलीस विभागातील सिस्टिमचे गौडबंगाल उघडकीस आले आहे. शहरात तैनात असताना भूमाफिया व गुन्हेगारांना अभय देणासाठी चर्चेत असलेल्या या अधिकाऱ्याला ज्या तत्परतेने पसंतीची बदली देण्यात आली, त्यावरून पोलीस अधिकाऱ्यांमधील वादाला नव्याने तोंड फुटले आहे.
स्वत:ला साहसी आणि कायद्याचा ज्ञाता संबोधणाऱ्या या अधिकाऱ्याची पोस्टिंग चार वर्षांपूर्वी नागपूरला देण्यात आली होती. तत्कालीन प्रमुखाने त्याला डोक्यावरच बसवले होते. त्याच्यासाठी एक स्वतंत्र शाखेची निर्मितीच करण्यात आली होती. येथे राहून त्याने अनेक जमीन विवादाच्या प्रकरणांचा निपटारा ‘टेबल’वरच केला होता. मात्र, एका प्रकरणात तत्कालीन प्रमुखच अडचणीत आले होते आणि त्यानंतर त्याला तडकाफडकी बाजूला करण्यात आले होते. मलाईदार पोस्टिंगवरून हटविल्यामुळे नाराज झालेल्या या अधिकाऱ्याने प्रमुखाला अशा तऱ्हेने त्रस्त करून सोडले होते की, त्यांना न्यायालय व वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तरे देताना घाम फुटला होता. प्रमुखाची बदली झाल्यानंतर या अधिकाऱ्याचे दिवसही फिरले. नवी पोस्टिंग मिळताच तो पुन्हा भूमाफियांकरिता ‘मॅनेजमेंट’ करायला लागला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत त्याने गर्भश्रीमंत लोक सहभागी असलेल्या कोट्यवधीच्या जमीन व्यवहारात हात टाकण्यास सुरुवात केली होती.
वर्षभरापूर्वी अमितेश कुमार यांनी कमान सांभाळताच, शहर पोलिसांच्या कामकाजात अनेक परिवर्तन घडविले. त्यांनी भूमाफियांच्या विरोधात कारवाईचा सपाटा लावत त्यांची कंबर तोडण्यास प्रारंभ केला. याच श्रृंखलेत कामठीच्या मोठ्या भूमाफिया टोळीच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणात या अधिकाऱ्यांचा सहभाग उघडकीस आला. त्याने कामठीच्या या भूमाफियाला उघडउघड मदत केली होती. आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्याने काम केले होते. यातून बाहेर पडलेल्या तथ्यानुसार अधिकारी व भूमाफियामध्ये झालेल्या सौद्याचा खुलासा झाला. परंतु, पोलीस विभागाची विश्वसनीयता वाचविण्यासाठी ही बाब प्रकाशझोतात येणार नाही, असे प्रयत्न केले गेले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रोष अंगावर येऊ नये म्हणून तो तात्काळ आजारी पडला. या बनावट आजारातही त्याने सहा महिने मंत्रालय आणि आपल्या श्रेष्ठींकडे चकरा मारल्या. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, काही दिवसापूर्वी त्याला त्याच्या आवडत्या शहरात बदली मिळाली. गुन्हेगारीत सहभाग असतानाही त्याला पसंतीच्या जागेवर पोस्टिंग मिळाल्याने संबंधित पोस्टिंगचा हक्क असलेले अनेक अधिकारी ठगल्याच्या भावनेने निराश झाले आहेत. संबंधित पोस्टिंगसाठी योग्य असतानाही त्यांना बदली दिली नसल्याने ते नाराज झाले आहेत.
...................