हिंदू एकजुटीचा संकल्प
By admin | Published: January 12, 2015 01:05 AM2015-01-12T01:05:44+5:302015-01-12T01:05:44+5:30
विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त येथील रेशीमबाग मैदानावर रविवारी झालेल्या हिंदू संमेलनात हिंदू एकजुटीचा संकल्प करण्यात आला.
विहिंपचा सुवर्णजयंती महोत्सव : हिंदू महासंमेलन
नागपूर : विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त येथील रेशीमबाग मैदानावर रविवारी झालेल्या हिंदू संमेलनात हिंदू एकजुटीचा संकल्प करण्यात आला.
व्यासपीठावर स्वामी चिन्मयानंद सरस्वती, (हरिद्वार), दादा पगलानंद महाराज, साईखेडा, दिनेशचंद्र (दिल्ली), बालयोगी बालकदास महाराज, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर, सुवर्णजयंती महोत्सव समितीचे विदर्भ अध्यक्ष बी.सी. भरतीया, विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष विजयजित वालिया, विहिंपचे महानगर अध्यक्ष सुदर्शन शेंडे, वंदना खुशलानी यांच्यासह विहिंपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
व्यासपीठावर बसलेल्या सर्व प्रमुख वक्त्यांनी त्यांच्या भाषणात भारताला अधिक बळकट करण्यासाठी आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी हिंदूंची एकजूट आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. इतर सर्व धर्मांपेक्षा हिंदू धर्म प्राचीन असल्याने हिंदूच या देशाचा खरा मालक आहे, आता विश्व कल्याणासाठी हिंदूंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दिनेशचंद्र यांनी केले. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराला कडाडून विरोध करताना त्यांनी हिंदू धर्मातील वाईट चालीरीतींवरही प्रहार केला. वंदना खुशलानी यांनी हिंदू धर्माची महत्ता सांगितली. स्त्री-पुरुष समानतेला विरोध करताना त्यांनी हिंदू धर्मात महिलांना पुरुषांपेक्षा अधिक सन्मान मिळत असल्याचे अनेक उदाहरण देऊन स्पष्ट केले.चिन्मयानंद सरस्वती यांनीही हिंदू एकजुटीवर भर देत मुस्लीम कट्टरवादावर टीका केली. मुस्लीम कट्टरवादाचा समाना करण्यासाठी हिंदूंची एकजूट आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बाबा पगलानंद महाराज यांनी देशातून गोहत्या बंद करायची असेल तर गाईला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली. यावेळी बालयोगी बालकदास महाराज, बी.सी. भरतीया, विजयजित वालिया, सुनील मानसिंगा यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक सुदर्शन शेंडे यांनी केले. संचालन मृणालिनी दस्तुरे यांनी तर आभार वासुदेव नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला ब्रह्मस्थानंद महाराज, श्रीरामपंत जोशी, राजेश लोया, दिलीप गुप्ता, हेमंत जांभेकर, राजे मुधोजी भोसले, प्रफुल्ल गाडगे, श्रीकांत आगलावे, संजय चौधरी, सुनील काशीकर, अजय निलादवार, निरंजन रिसालदार, सदन गुप्ता, प्रशांत तितरे यांच्यासह विहिंप आणि संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)