गोंड राजघराण्याच्या ऐतिहासिक खुणा होत आहेत नामशेष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 11:40 AM2021-07-30T11:40:14+5:302021-07-30T11:47:43+5:30

Nagpur News गोंडराजा बख्त बुलंद महिपत शहा राजाने १७०२ मध्ये सत्तासंघर्षाच्या सावटात बारा गावांचे मिळून नागपूर आकाराला आणले आणि गोंड राज्याची राजधानी म्हणून नेमले. मात्र, त्याच राजघराण्याच्या स्मृती नामशेष झाल्या आहेत.

Historical landmarks of the Gond dynasty are becoming extinct | गोंड राजघराण्याच्या ऐतिहासिक खुणा होत आहेत नामशेष 

गोंड राजघराण्याच्या ऐतिहासिक खुणा होत आहेत नामशेष 

googlenewsNext
ठळक मुद्देराजा बख्त बुलंद शहाचा इतिहास विस्मृतीत १७०२ साली केली हाेती नागपूरची स्थापना

 

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘ज्यांना आपल्या इतिहासाचे स्मरण नसते, त्यांना नंतर इतिहासही विसरतो’, ही म्हण वास्तववादी आहे. गोंडराजा बख्त बुलंद महिपत शहा हा नागपूरचा लखलखता इतिहास आहे आणि त्याच इतिहासाच्या खाणाखुणा नागपूरकर विसरत चालले आहेत. याच राजाने १७०२ मध्ये सत्तासंघर्षाच्या सावटात बारा गावांचे मिळून नागपूर आकाराला आणले आणि गोंड राज्याची राजधानी म्हणून नेमले. मात्र, त्याच राजघराण्याच्या स्मृती नामशेष झाल्या आहेत.

गोंड राजांच्या राज्यकारभाराचा कालखंड

राजा जाटबा - १५९० ते १६२० (देवगडचे संस्थापक)

राजा कोकशाह - (कालावधी उपलब्ध नाही)

राजा बख्त बुलंद महिपत शहा - १६८६ ते १७०९ (१७०२ मध्ये नागपूर वसवले.)

राजा चांद सुल्तान - १७०९ ते १७३५ (जुम्मा तलाव अर्थात शुक्रवारी तलाव, जुम्मा दरवाजा अर्थात गांधी गेटची निर्मिती.)

राजा वली शाह - १७३५ ते १७३८

राजा बुरहान शाह - १७४३ ते १७९६

राजा बहराम शाह - १७९६ ते १८२१

राजा रहमान शाह - १८२१ ते १८५२

राजा सुलेमान शाह - १८५२ ते १८८५

राजा आजम शाह - १८८५ ते १९५५

राजा बख्त बुलंद शाह द्वितीय - १९५५ ते १९९३

राजा वीरेंद्र शाह - १९९३ पासून

सत्तासंघर्ष आणि नागपूरची स्थापना

राजा जाटबा यांच्यानंतर कोकशहा गादीवर आले. कोकशहानंतर महिपत शहा गादीवर बसले. मात्र, लहान भाऊ दीनदार शहाने महिपतशहा यांना पराभूत करून देवगडची गादी हडपली. दरम्यान, मराठे व औरंगजेबात प्रचंड संघर्ष सुरू होता. औरंगजेब देवगडकडून चौथ वसुली करत असे. त्यामुळे आंतरिक संघर्षात महिपत शहाने औरंगजेबाची मदत मागितली आणि त्याच्याकडून बख्त बुलंद हा खिताब घेऊन देवगडची गादी आपल्या भावाकडून हस्तगत केली. दरम्यान, साताऱ्याचे छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेबाच्या पवनार किल्ल्यावर हल्ला चढवून तो लुटला. यासाठी औरंगजेबाने महिपत शहा यांना जबाबदार ठरवले आणि देवगडवर हल्ला केला. त्यामुळे राज्य संरक्षणार्थ महिपत शहा यांनी आपल्याच प्रांतातील नागपूर येथे तळ ठोकला. सीताबर्डी, वाठोडा, गाडगा, हरिपूर, वानडे, भानखेडा आदी बारा गावे मिळून १७०२ साली नागपूर वसवले आणि पुढे नागपूर हीच गोंड राज्याची राजधानी झाली.

 

जन्म आणि मृत्यू

नागपूरचे संस्थापक असलेले गोंडराजा बख्त बुलंद महिपत शहा यांचा जन्म व मृत्यूविषयी निश्चित अशी आकडेवारी सापडत नाही. मात्र, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष व नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यांच्या समितीने संशोधनातून ३० जुलै १६६८ ही त्यांची जन्मतारीख शोधून काढली. त्यांचा मृत्यू १७०९ च्या आसपास झाल्याचे सांगितले जाते. मात्र, तारीख अजून निश्चित झालेली नाही.

 

* जगनाडे चौक, नंदनवन परिसराला आजमशहा ले-आऊट म्हणून ओळखले जाते. ते गोंड राजवंशातीलच होते.

* मेडिकल चौक येथील प्रसिद्ध राजाबाक्षा हनुमान मंदिराची स्थापना बख्त बुलंद महिपत शहा यांनीच केली. बख्त बुलंदचा अपभ्रंश होऊन पुढे राजाबाक्षा हेच नाव प्रचलित झाले.

* महाल हे नाव गोंड राजाच्या महालामुळेच पडले. कल्याणेश्वर मंदिराच्या पुढे झेंडा चौकाकडे जाताना उजव्या हातावर किल्ला वाॅर्डात पक्वासा रुग्णालयाच्या शेजारी आजही हा महाल उभा आहे.

* सध्या या महालात राजमाता राजेश्री देवी शहा, त्यांचे पुत्र राजे वीरेंद्र शहा, सून शुभदा शहा, नातवंड दिग्विजय व वात्सल्य शहा यांचे वास्तव्य आहे.

* या महालातील तीन बुरुज औरंगजेबाच्या युद्धाच्यावेळी खचले. एक बुरुज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. तेथे तत्कालीन युद्धात वापरली जाणारी तोफ आजही उभी आहे. मात्र, झाडांनी वेढल्यामुळे ती दिसत नाही.

* २००२ मध्ये नागपूरच्या स्थापनेला ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिव्हिल लाईन्स येथे विधानभवनापुढे गोंडराजे बख्त बुलंद शहा यांचा सिंहासनावर आरूढ असा पुतळा तत्कालीन महापौर माया इवनाते यांच्या प्रयत्नांनी उभारण्याच्या प्रस्तावाला २००८ मध्ये मंजुरी मिळाली. आज तेथे हा पुतळा उभा आहे.

गोंडराज्याचा विसर

नागपूरच्या स्थापनेचे श्रेय आपले पूर्वज गोंडराजा बख्त बुलंद महिपत शहा यांना आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले. आता कुठे गोंडराज्याचा इतिहास पुढे येत आहे. अनेक स्थळे दुर्लक्षित आहेत तर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून, स्मारक म्हणून म्हणा वा ऐतिहासिक वारसा म्हणून ते विकसित होणे गरजेचे आहे.

- गोंडराजे वीरेंद्र शहा

Web Title: Historical landmarks of the Gond dynasty are becoming extinct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास