जाणिवा जागृत झाल्या तर झोपडीतही सौंदर्य जाणवते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:37 IST2019-03-03T00:35:57+5:302019-03-03T00:37:08+5:30
घर म्हणजे केवळ चार भिंती नाही, त्यात राहणारे लोक नाही, तर ती एक संवेदना, भावना आहे. ही जाणीव जागृत झाल्यास ताजमहालाचेच नाही तर साध्या झोपडीतही सौंदर्य जाणवायला लागते. गोरेपेठ येथील विष्णू मनोहर यांच्या गोविंद भवनात ‘घर’ या विषयावर अतुल पेठे यांचा अनोखा वाचन प्रयोग सादर झाला.

जाणिवा जागृत झाल्या तर झोपडीतही सौंदर्य जाणवते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घर म्हणजे केवळ चार भिंती नाही, त्यात राहणारे लोक नाही, तर ती एक संवेदना, भावना आहे. ही जाणीव जागृत झाल्यास ताजमहालाचेच नाही तर साध्या झोपडीतही सौंदर्य जाणवायला लागते. गोरेपेठ येथील विष्णू मनोहर यांच्या गोविंद भवनात ‘घर’ या विषयावर अतुल पेठे यांचा अनोखा वाचन प्रयोग सादर झाला.
आपण आपल्या घरात आयुष्याच्या खूप महत्त्वाचा काळ घालवतो. पण या वास्तूला अवकाशाला गृहित धरतो, त्याबद्दलच्या संवेदना हरवून जातो. त्याचबरोबर घराबाहेरचा बकालपणा, घरातला अव्यवस्थितपणा आपल्याला खुपायला लागले. पण घर हे संवेदनांच्या जागृतीचे स्थळ आहे. ‘किमया’ हे ज्येष्ठ वास्तुशिल्पकार माधव आचवल यांनी लिहिलेले पुस्तक आहे. घर ही फक्त स्क्वेअर फुटात मोजता येणारी केवळ वापरायची गोष्ट नाही, तर ती वास्तुकला असते आणि कळत-नकळत आपल्या सर्व जीवनावर प्रभाव टाकते, असा दृष्टिकोन देणारे हे पुस्तक आहे. माधव आचवलांच्या ‘किमया’ पुस्तकातील काही भाग प्रसिद्ध प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे यांनी वाचून दाखविला. घराचे अतिशय सुरेख वर्णन त्यांनी या प्रयोगातून केले, सोबतच अमोल चाफळकरांची मांडणी शिल्पे होती. संगीत नरेंद्र भिडे यांचे होते. प्रकाशयोजना राहुल लामखडे यांची होती, सोबतच नीलेश काळे यांच्या छायाचित्राचे प्रदर्शनही भरले होते.