११ सप्टेंबर पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण; एसटीचे कामगार संघटना पुन्हा आक्रमक
By नरेश डोंगरे | Updated: August 5, 2023 20:06 IST2023-08-05T20:06:41+5:302023-08-05T20:06:51+5:30
नागपूर : वारंवार मागणी करूनही प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याचे पाहून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा निर्णय ...

११ सप्टेंबर पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण; एसटीचे कामगार संघटना पुन्हा आक्रमक
नागपूर : वारंवार मागणी करूनही प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याचे पाहून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कोअर कमेटीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. एसटीच्या कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा केला जात आहे.
यापूर्वी झालेल्या करारातील तरतुदीनुसार शासनाने देय असणारा ४२ टक्के महागाई भत्ता लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक, मुळ वेतनात जाहीर झालेल्या रुपये पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात, ४८४९ कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप त्वरीत करण्यात यावे, या रकमांचे समायोजन करून दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा, वाहन रोजनाम्यानुसार प्रत्यक्ष धाववेळ देण्यात यावी, नवीन बसेसचा पुरवठा करण्यात यावा, सेवानिवृत्तांना पत्नीसह व विद्यमान कर्मचा-यां ना सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमीली पास देण्यात याव्या, या मागण्यांसह आणखी पाच मागण्यांचा त्यात समावेश आहे. त्याची पूर्तता होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. या पार्श्वभूमीवर, ३ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शासनाला उपरोक्त मागण्या पूर्ण करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आझाद मैदान मुंबई येथे ११ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
... तर, जिल्हास्तरावरही आंदोलन
सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर १३ सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्हास्थळी एसटी कर्मचारी बेमुदत उपोषण करतील, असा ईशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी लोकमतशी बोलताना दिला आहे.