रेल्वे मेन्स शाळेला ताेडणे वेदनादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:05+5:302020-12-24T04:10:05+5:30
उदय अंधारे नागपूर : संत्रानगरीतील अनेक चढउतार अनुभवलेल्या वारशांपैकी एक असलेली रेल्वे मेन्स शाळा प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी पाडली ...
उदय अंधारे
नागपूर : संत्रानगरीतील अनेक चढउतार अनुभवलेल्या वारशांपैकी एक असलेली रेल्वे मेन्स शाळा प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी पाडली जाण्याचा प्रस्ताव अनेकांसाठी वेदनादायी ठरत आहे. अजनीतील वनसंपदेप्रमाणे ही शाळाही अनेकांच्या भावनेचा विषय आहे. त्यामुळे ती तुटली जाणार, या विचाराने विशेषत: शाळेचे माजी विद्यार्थी भावनिक झाले आहेत. आधीच मराठी शाळांना घरघर लागली असताना हा वारसाही तुटला जाइल, हा विचार अनेकांसाठी वेदनादायी ठरत आहे. त्यामुळे एकतर प्रकल्पातून शाळा वगळा किंवा हा प्रकल्पच इतरत्र स्थानांतरित केला जावा, अशा भावना या माजी विद्यार्थ्यांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केल्या.
याेग्य जागा निवडावी
प्रतिष्ठित एलआयटी काॅलेजच्या केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रशिक्षण अधिकारी डाॅ. राजेंद्र उगवेकर म्हणाले, आतापर्यंत शाळेबाबत कुठलीही समस्या आली नसली तरी अजनीची ही जागा रेल्वेची असल्याने एक ना एक दिवस रेल्वे मेन्स शाळेचा बळी जाणारच हाेता. इंटर माॅडेल स्टेशनसाठी ही जागा अधिग्रहित करण्यात आल्याने शाळा तुटणार आहे. मात्र प्रशासनाने जवळच चांगली जागा निवडावी जेणेकरून परिसरातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना समस्या निर्माण हाेणार नाही.
या शाळेमुळेच मी घडलाे
एका खासगी कंपनीचे व्यवस्थापक अशाेक घुई यांनी भावना व्यक्त केली. असंख्य विद्यार्थी निर्माण करणाऱ्या एका शाळेचे असे ताेडले जाणे पहावत नाही. मी जेव्हा जेव्हा या शाळेसमाेरून जाताे, तेव्हा एक ऊर्जा प्राप्त हाेते. त्यावेळी शिक्षकांनी दिलेले संस्कार आठवतात. विकास महत्त्वाचा आहे पण त्यासाठी एखाद्या शाळेचा बळी जाणे दु:खदायक आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही.
विद्यार्थी व शिक्षकांची समस्या येऊ नये
एका सरकारी शाळेत शिक्षक असलेले राजेंद्र जाेशी म्हणाले, प्रकल्पासाठी रेल्वे मेन्स शाळा ताेडल्यानंतर पहिला प्रश्न हा येताे की ही शाळा याेग्य जागी पुनर्स्थापित हाेणार की नाही. मात्र शाळा तुटल्याने येथील विद्यार्थी व शिक्षक भरडले जाऊ नये. शिक्षकांचे नाेकरीचे नुकसान हाेऊ नये. असे झाले तर इंटर माॅडेल स्टेशनसारख्या विकासाच्या प्रकल्पाला अर्थ उरणार नाही. त्यामुळे त्याचा विराेध व्हायलाच हवा.
शाळा वगळण्यात यावी
स्वयंराेजगार करणारे अविनाश भट यांनी माॅडेल स्टेशन प्रकल्पातून शाळा वगळण्यात यावी, अशी भावना व्यक्त केली. विकासाला विराेध करता येत नाही कारण ताे शहराच्या गरजेशी जुळलेला भाग आहे. मात्र त्याचवेळी या शाळेचाही विचार केला जावा. एकतर जवळच कुठेतरी ती स्थानांतरित करावी किंवा प्रकल्पामधून ती वगळण्यात यावी. याशिवाय अजनी परिसरातील हिरवळ वाचविण्याचाही प्रयत्न व्हायला हवा, अशी भावना भट यांनी व्यक्त केली.
सरकारने मराठी शाळा वाचवायला हव्या
आधीच राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत आणि त्यांची संख्या बाेटावर माेजण्याइतकी राहिली आहे. रेल्वे मेन्स शाळा आहे त्या जागेवरून हटविण्यात आली तर मराठी माध्यमात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान आहे. एकीकडे सरकार मराठी शाळा वाचविण्याच्या गाेष्टी करते आणि दुसरीकडे तुटणाऱ्या शाळांचे संवर्धन केले जात नाही. ही शाळा परिसरातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार आहे आणि तीच तुटली तर त्यांचे माेठे नुकसान हाेईल.
- मनाेहर जाेग, माजी प्राचार्य, रेल्वे मेन्स स्कूल