गॅस निर्मिती प्रकल्पाची नुसती घोषणाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:35+5:302021-09-02T04:17:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कॉटन मार्केट, कळमना, शहरातील मोठी हॉटेल्स, आठवडी बाजार तसेच नागरिकांच्या घरातून निघणाऱ्या टाकाऊ भाजीपाल्यापासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉटन मार्केट, कळमना, शहरातील मोठी हॉटेल्स, आठवडी बाजार तसेच नागरिकांच्या घरातून निघणाऱ्या टाकाऊ भाजीपाल्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु पदाधिकारी व मनपा प्रशासनाला याचा विसर पडल्याने प्रकल्पाची नुसती घोषणाच ठरली आहे.
महापालिका निवडणूक आली ही उद्घाटनांचा घाट घातला जातो. मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. असेच गॅस निर्मिती प्रकल्पाचे झाले आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना या प्रकल्पाची घोषणा झाली होती.
शहरात दररोज ९०० ते १००० मेट्रिक टन कचरा निघतो. यात १५० ते २०० टन टाकाऊ भाजीपाला निघतो. भाजी मार्केट व आठवडी बाजारातून तो तातडीने उचलला जात नाही. यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो. याचा विचार करता टाकाऊ भाजीपाल्यापासून गॅस निर्मिती केली जाणार होती. याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करून, तो राज्य सरकारकडे पाठविला होता. पुढे त्याचा पाठपुरावा झाला नाही.
...
भांडेवाडीला उभारणार होता प्रकल्प
भांडेवाडीमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार होता. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आठवडी भाजीबाजारात उरलेला व खराब भाजीपाला भाजी विक्रेते तिथेच टाकून देतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.
...
बससाठी वापरले जाणार होते सीएनजी
टाकाऊ भाजीपाल्यापासून मिथेन गॅसची निर्मिती करून नंतर हा गॅस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येणार होता. याचा वापर मनपाच्या शहर बससाठी केला जाणार होता. यातून मनपाची मोठी आर्थिक बचत होणार होती. परंतु पाठपुरावा न झाल्याने हा प्रकल्प बारगळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.