हेरिटेजच्या संचालकाविरुद्ध जमीन हडपण्याचा गुन्हा

By Admin | Published: October 28, 2015 03:13 AM2015-10-28T03:13:08+5:302015-10-28T03:13:08+5:30

एका गरीब आणि वृद्ध निराधार महिलेची लाखो रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून प्रतापनगर पोलिसांनी हॉटेल हेरिटेजचे संचालक रणधीर जगतापसिंग

Land grab against the Director of Heritage | हेरिटेजच्या संचालकाविरुद्ध जमीन हडपण्याचा गुन्हा

हेरिटेजच्या संचालकाविरुद्ध जमीन हडपण्याचा गुन्हा

googlenewsNext

साडेतीन लाखांचे कर्ज दिले : ७५ लाखांची जमीन हडपण्याचा कट, वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाई
नागपूर : एका गरीब आणि वृद्ध निराधार महिलेची लाखो रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून प्रतापनगर पोलिसांनी हॉटेल हेरिटेजचे संचालक रणधीर जगतापसिंग ऊर्फ सोनू खंडूजा आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.सीताबाई सुखराम मेंढे (वय ६५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
मुलगा सुनेसह त्या गोपालनगरात (प्रतापनगर) राहतात. गजानन नगरात सीताबाईच्या पतींनी १९७३ मध्ये १५०० चौरस फुटाचा भूखंड विकत घेतला होता. १९९७ मध्ये सुखराम मेंढे यांचे निधन झाल्यामुळे सीताबाई, त्यांच्या दोन मुली गीताबाई ब्राह्मणकर आणि लताबाई भूपेंद्र सिंग तसेच मुलगा रामू सुखराम मेंढे या भूखंडाचे वारसा हक्काने कायदेशीर मालक झाले. कालांतराने मुलगी गीताबाई आणि मुलगा रामू आपापल्या परिवारासह वेगळे राहू लागले. या भूखंडावरील घरात वृद्ध सीताबाई, त्यांची मुलगी लताबाई तिच्या परिवारासह राहात होती. लताबाईचा मुलगा कुलदीप सिंग याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो उधारी घेऊन खर्च करीत होता. त्याच्यावर झालेल्या कर्जाची रक्कम चुकती करण्याची क्षमता नसल्यामुळे आणि कर्जदार घरावर येऊन भांडत असल्यामुळे कुलदीपच्या ओळखीच्या त्रिमूर्तीनगरातील गोल्डी गुप्ता याच्याकडून २०१३ मध्ये २ लाख, ५० हजार रुपये कर्ज घेतले. गुप्ताने कर्ज देताना सीताबार्इंच्या पतीच्या नावे असलेल्या भूखंडाची मूळ कागदपत्रे स्वत:कडे ठेवून घेतली. व्याजाची दरमहा रक्कम आवाक्याबाहेर असल्यामुळे कधीकधी ती थकीत होत होती.
त्यामुळे गोल्डी वसुलीसाठी तगादा लावायचा. त्याने नंतर हे कर्ज एकरकमी परत करण्यासाठी वेठीस धरणे सुरू केले. याच दरम्यान, हेरिटेज हॉटेलचा संचालक रणधीर जगताप सिंग ऊर्फ सोनू खंडूजा (रा. सहोदय टॉवर, कडबी चौक), रितेश प्रमोद खांडेकर (रा. यादवनगर), राजा रमेश यादव (रा. कडबी चौक) हरपालसिंग नाहाटा (फे्रंडस् कॉलनी) यांच्याशी कुलदीपची ओळख झाली होती. त्यामुळे कुलदीपने गोल्डीच्या कर्जाच्या तगाद्याबद्दल त्यांना माहिती सांगितली. यावेळी राजा यादवने सीताबार्इंच्या घरी येऊन गोल्डीचे कर्ज परत करण्यास मदत करतो, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

फसवणुकीचा कट
राजाने कर्ज परत करण्यासाठी ३ लाख , ५० हजार रुपये कर्ज मिळवून देण्याचे मान्य केले. मात्र त्यासाठी भूखंडाचे वारसदार असलेल्या चारही लोकांना रजिस्ट्री कार्यालयात गहाणखत करून देण्यासाठी यावे लागेल, अशी अट घातली. पैशाची नितांत गरज असल्यामुळे सीताबार्इंसह तिच्या वारसदारांनी राजा यादवने सांगितल्याप्रमाणे सर्व केले. २ डिसेंबर २०१३ ला गहाणपत्राची कागदपत्रे असल्याचे सांगून ते वाचून न दाखवताच सीताबार्इंच्या अंगठ्याचा ठसा आणि इतरांच्या त्यावर सह्या घेतल्या. त्यानंतर यादवने सीताबार्इंना २ लाख ८० हजारांचा चेक दिला. ११ जानेवारी २०१४ ला सीताबार्इंची मुलगी लताबाई हिने बँकेतून रक्कम काढताच त्यातील ५० हजार यादवने मागून घेतले. उर्वरित २ लाख ३० हजारांपैकी २ लाख रुपये गोल्डी गुप्ताला देण्यास सांगितले. साडेतीन लाखांच्या नावाखाली केवळ ३० हजार रुपये हातात पडल्यामुळे सीताबार्इंनी आक्षेप घेतल्यानंतर त्याने पुन्हा तिला दोन वेळा प्रत्येकी ५० हजार रुपये दिले. या एकूण रकमेच्या बदल्यात महिन्याला १० हजार ५०० रुपये तो व्याज मागत होता. हे व्याज परवडणारे नसल्यामुळे सीताबाई आणि त्यांच्या वारसदारांनी कर्जाची रक्कम परत करण्याचे ठरवले. तसे त्यांनी यादवला सांगून रकमेची व्यवस्था आम्ही करतो, तू आमची कागदपत्रे आणून दे, असे सांगितले. यावेळी यादवने ही कागदपत्रे हेरिटेजच्या मालकाकडे ठेवली आहे, त्यानेच तुम्हाला ती रक्कम व्याजाने दिल्याचे सांगितले. त्यामुळे सीताबाई परिवारासह एप्रिल २०१५ मध्ये हेरिटेज हॉटेलमध्ये जाऊन खंडूजा यांना भेटली. यावेळी त्याने तुमचा भूखंड आणि त्यावरील घर ३० लाखात खरेदी केल्याचे सांगितले. तुम्हाला रक्कमही दिल्याचे तो म्हणाला. यावेळी धाकदपट करून त्याने परत पाठविले. त्यानंतर सीताबाई आणि तिच्या वारसांनी घेतलेले साडेतीन लाख रुपये एकरकमी परत करतो, तुम्ही आमची कागदपत्रे परत करण्याची विनवणी केली. मात्र, खंडूजा आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला दाद दिली नाही. एवढेच नव्हे तर पुढे ११ जुलै २०१५ ला आलेल्या गुंडांनी सीताबार्इंना त्यांच्या मालकीच्या घरातून परिवारासह हुसकावून लावले.
अशीही बनवाबनवी
सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा भूखंड अवघ्या साडेतीन लाखात हडपल्यामुळे बेघर झालेल्या सीताबाई आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आपला भूखंड परत मिळवण्यासाठी अनेकांचे हातपाय जोडले. दरम्यान, सीताबाई आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना अंधारात ठेवून खंडूजा आणि साथीदारांनी या भूखंडाची श्रीराम आणि अनिल संपत देशमुख (रा. बेलतरोडी) या भावांच्या नावे विक्रीपत्र करून घेतल्याचे उघड झाले. या अन्याय आणि फसवणुकीची पोलिसांकडे तक्रार करूनही फायदा झाला नाही. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेले. वरिष्ठांकडून कानउघाडणी झाल्यानंतर ८ आॅक्टोबरला प्रतापनगर पोलिसांनी रणधीर खंडूजा, रितेश खांडेकर, राजा यादव आणि हरपालसिंग नाहटा या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Land grab against the Director of Heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.