कळमन्यातील हत्याकांडाचे गूढ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:00 IST2019-03-09T23:59:28+5:302019-03-10T00:00:12+5:30
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारगाव शिवारात गणपती पाटील यांच्या शेतात आढळलेल्या मृतदेहाची २४ तास होऊनही ओळख पटलेली नाही. शुक्रवारी सायंकाळी ६.५० वाजता कळमना पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली होती.

कळमन्यातील हत्याकांडाचे गूढ वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारगाव शिवारात गणपती पाटील यांच्या शेतात आढळलेल्या मृतदेहाची २४ तास होऊनही ओळख पटलेली नाही. शुक्रवारी सायंकाळी ६.५० वाजता कळमना पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली होती. पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. मृत तरुणाचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे असून आरोपीने धारदार शस्त्राने त्याचा गळा कापून हत्या केल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, आता २४ तास होऊनही मृत कोण आणि त्याला कुणी मारले, त्याचा पोलिसांना छडा लागला नाही. त्यामुळे हे हत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. हा तरुण नागपुरातील की बाहेरगावचा, त्याला येथे आणून मारले की बाहेर मारून शेतात फेकून दिले, हत्येचे कारण काय, असे अनेक प्रश्न चर्चेला आले आहे.
महिलेचाही मृतदेह आढळला
या हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पुन्हा शुक्रवारी सायंकाळी कळमन्यातील कापसी पुलाजवळच्या सनी ढाब्याजवळ एका पडक्या झोपडीत अंदाजे ४० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला. ती महिला कोण, हा आकस्मिक मृत्यूचा प्रकार आहे की हत्येचा ते देखिल स्पष्ट होऊ शकले नाही. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.