नागपुरात साखर ३५ रुपयांवर! दिवाळीनंतर क्विंटलमागे १५० रुपयांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:29 AM2018-12-05T00:29:07+5:302018-12-05T00:31:23+5:30
गेल्या वर्षी ठोक बाजारात प्रति किलो ३८ रुपयांवर पोहोचलेले साखरेचे भाव यावर्षी ३३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पण किरकोळमध्ये साखर ३५ रुपये किलो विकली जात आहे. स्वस्ताईमुळे ग्राहकांना साखरेचा गोडवा अनुभवायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षी ठोक बाजारात प्रति किलो ३८ रुपयांवर पोहोचलेले साखरेचे भाव यावर्षी ३३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पण किरकोळमध्ये साखर ३५ रुपये किलो विकली जात आहे. स्वस्ताईमुळे ग्राहकांना साखरेचा गोडवा अनुभवायला मिळत आहे.
ठोक व्यापारी रामदास वजानी यांनी सांगितले की, दिवाळीत ठोकमध्ये भाव प्रति क्विंटल ३,५०० रुपयांवर होते, पण आता जवळपास १५० रुपयांची घट झाली आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन जास्त आहे. मिल संचालकांकडे ऊस उत्पादकांकडे पैसे देण्यास निधी नाही. त्यामुळे कमी भावातच विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना उसाची योग्य किंमत मिळावी आणि साखरेचे भाव २३५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्यानंतर केंद्र सरकारने जूनमध्ये साखरेची किमान किंमत २९०० रुपये अशी निश्चित केली होती. त्यानंतर भावात सुधारणा झाली. सध्या मिल क्वालिटी भाव २९५० ते ३००० रुपये आहेत. त्यात पाच टक्के जीएसटी आणि भाडे असे जवळपास ३०० रुपये जोडून नागपुरात ठोक व्यापाऱ्यांना साखर ३२०० ते ३३०० येत आहेत.
इतवारी ठोक बाजारात एम क्वालिटीच्या साखरेचे भाव प्रति क्विंटल भाव ३३७० ते ३४०० रुपये आणि साखर-एसचे भाव ३२८० ते ३३३० रुपये आहेत. पण किरकोळमध्ये ३५ ते ३६ रुपये विकल्या जात आहे. भाव कमी झाल्यानंतरही बाजारात ग्राहकी नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वजानी म्हणाले, केंद्र सरकारने आॅक्टेबरमध्ये २१ लाख टन आणि नोव्हेंबरला २२ लाख टन असा जादा कोटा विक्रीसाठी निश्चित केला होता. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या भावात दोन्ही महिन्यात थोडीशी वाढ झाली. पण दिवाळी संपताच साखरेच्या भावात पुन्हा घसरण सुरू झाली. सध्या बाजारपेठेत साखरेची मागणीही घटली आहे.