देशाच्या विकासासाठी वेगळ्या दृष्टीची गरज
By admin | Published: January 12, 2015 12:59 AM2015-01-12T00:59:53+5:302015-01-12T00:59:53+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती.
अरुणकुमार : अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख राष्ट्र साधना संमेलन
यवतमाळ : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती. मात्र आज ते देश विकासाच्या बाबतीत पुढे निघून गेले. मात्र आपण विकासाची दृष्टी नसल्याने मागे राहलो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख अरूण कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या राष्ट्र साधना संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यवतमाळातीेल पोष्टल ग्राउंड मैदानावर रविवारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कृषी भूषण शेतकरी आणि निसर्ग चळवळीचे सुभाष शर्मा होते. यावेळी मंचावर बापूराव तायडे, दादाराव भडके, सुरेश गोफने, सुखदेव ढवळे, सुरेंद्र खोडवे, अण्णाजी कुरडे, प्रदीप वडनेरकर, विजय कोषटवार होते. अरूण कुमार पुढे बोलताना म्हणाले, भारताच्या विकासासाठी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे पहिले लक्ष होते. देश गुलामगिरीतून मुक्त झाला, पण इंग्रजी आणि त्यांच्या संस्कृतीत अधिक गुरफटल्या गेला. परिणामी आपला संपूर्ण विकास खुंटला. आतापर्यंत तीनवेळा वैचारिक परिवर्तन पहायला मिळाले. सन १९४७, १९७७ आणि २०१५ मध्ये हे परिवर्तन प्रामुख्याने जाणवले. केवळ जागृकतेनेच हे घडले. मात्र विकासाला दिशा देण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाही. देशाला दिशा देण्याची गरज आहे. आज पर्यंत कुठलीही दिशा नसल्याने आपण पुढे गेलोच नाही. चीन, जपान, जर्मनी यासारखे देश एक दृष्टी समोर ठेवून पुढे गेले आहेत. आपल्यालाही अशीच दिशा समोर ठेवून काम करायचे आहे. यासाठी कुठलाही एक व्यक्ती परिवर्तन घडवू शकणार नाही. समाजाचे मोठे योगदान आवश्यक लागणार आहे. हे वैचारीक परिवर्तन घडविण्यासाठी स्वयंसेवकांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. देशातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी सकारात्मक विचार वाढायला हवेत. आपल्या पतनासाठी आपन स्वत: कारणीभूत आहोत. कुठलाही देश याला जबाबदार नाही. पूर्वी श्रीमंत होण्यासाठी लोक भारतात येत होते. आता आपण विदेशात जातो. हे कशामुळे होत आहे. आपले मुलभूत चक्र नष्ट करण्याचे काम झाले. यामुळे आपण माघारलो असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार भावना गवळी, हंसराज अहिर, पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)