नागपुरात नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:00 IST2018-03-03T23:59:49+5:302018-03-04T00:00:13+5:30
नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचपावलीतील बारसेनगरात शनिवारी दुपारी घडली.

नागपुरात नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचपावलीतील बारसेनगरात शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संचित संजय वाघमारे (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे आई-वडील हातमजुरी करतात. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. गरीब परिवारातील वाघमारे दाम्पत्याने संचितसोबत होळी आणि धुळवडीचा सण कसाबसा साजरा केला. संचित पाचपावलीतील सिंधी-हिंदी शाळेत शिकत होता. अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्याकडेही मोबाईल असावा, असे त्याला वाटत होते. मात्र, घरची जेमतेम परिस्थिती पाहून तो मन मारून राहत होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून त्याची मोबाईलची इच्छा फारच तीव्र झाली होती. आई-वडिलांना त्याने मोबाईल घेऊन देण्याची विनंतीही केली होती. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आई-वडिलांनी त्याची समजूत काढून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. संचित वरून शांत झाल्याचे दिसत असला तरी आतून अस्वस्थ होता. शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास त्याने गळफास लावून घेतला. आई-वडील घरी परतल्यानंतर त्याचा मृतदेह लटकल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला. एकुलत्या एक मुलाने अवघ्या १४ व्या वर्षीच आत्मघात केल्याने आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. संचितने शिकून खूप मोठा अधिकारी बनावे, असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, संचितच्या आत्मघाताने त्यांचे स्वप्न चिरडल्या गेले. माहिती कळताच शेजाऱ्यांनी वाघमारेंच्या घरासमोर मोठी गर्दी केली. पोलिसांनाही कळविण्यात आले. पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने संचितच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र काही ठोस हाती लागले नाही. आठ-दहा दिवसांपूर्वी संचितने मोबाईल घेऊन मागितला होता. नकार दिल्याने तो अस्वस्थ झाला होता. याच कारणामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.