जागतिक पाणथळ दिवस; महाराष्ट्रातील रामसर/ पाणथळ स्थळे आणि त्यांचे पर्यावरणीय महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 07:00 AM2022-02-02T07:00:00+5:302022-02-02T07:00:08+5:30

Nagpur News जगात सध्या २२०० पेक्षा जास्त जागांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. यामध्ये भारतातील ४२ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील केवळ २ जागा यात समाविष्ट आहेत आणि तिसरी विचाराधीन आहे.

Ramsar / Wetlands in Maharashtra and their Environmental Significance | जागतिक पाणथळ दिवस; महाराष्ट्रातील रामसर/ पाणथळ स्थळे आणि त्यांचे पर्यावरणीय महत्व

जागतिक पाणथळ दिवस; महाराष्ट्रातील रामसर/ पाणथळ स्थळे आणि त्यांचे पर्यावरणीय महत्व

googlenewsNext

नागपूरः  महाराष्ट्र निसर्गसंपदेच्या दृष्टीने अतिशय वैविध्यपूर्ण आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्रकिनारे यांनी नटलेल्या प्रदेशात पाणथळ जागासुद्धा आहेत. इंग्रजी भाषेत त्यांना 'वेटलँड्स' असे म्हणतात. १९७१ साली इराणमधील रामसर शहरात या जागांच्या संरक्षण आणि संवर्धनावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून पाणथळ जागांना 'रामसर स्थळे' असेही संबोधले जाते. या परिषदेतील ठराव १९७५ पासून अमलात आला. भारतात त्याची १९८५ पासून अंमलबजावणी सुरु झाली.

कशाला म्हणायचे पाणथळ जागा
एक प्रश्न असा येतो की कोणत्या जागांचा समावेश यात होतो. रामसर ठरावानुसार तलाव, नद्या, दलदली, दलदलींमधील गवताळ प्रदेश, खारफुटीची वने, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रवाळ बेटे अशा नैसर्गिक जागा आणि मत्स्यशेतीची तळी, भातशेती, धरणांचे जलाशय, मिठागरे इत्यादी मानवनिर्मित ठिकाणांचा समावेश होतो. ठरावाला मान्यता दिलेल्या देशांना आपल्या भूभागातील किमान एका जागेचा समावेश यात करावा लागतो. जगात सध्या २२०० पेक्षा जास्त जागांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. यामध्ये भारतातील ४२ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील केवळ २ जागा यात समाविष्ट आहेत आणि तिसरी विचाराधीन आहे.

महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून नाशिक जवळच्या नांदूर-मध्यमेश्वर अभयारण्यास मान्यता मिळाली. येथे कायम निवासी आणि स्थलांतरित अशा २५० पेक्षा जास्त पक्षांची नोंद आहे. सुमारे १०० चौ. किमी क्षेत्रावर विस्तार आणि पक्ष्यांची विविधता यामुळे पक्षीमित्रांमध्ये हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीवर एका दगडी बंधा?्यामुळे तयार झालेल्या या रामसर स्थळात जवळपास साडेपाचशे प्रकारच्या वनस्पती, सुमारे २४ प्रकारचे मासे, ४० हुन अधिक प्रकारची फुलपाखरे आढळतात. सप्टेंबरपासून मार्च पर्यंत स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने इथे येतात. सारस, लालसरी, पाणभिंगरी, शबल/धोबी, पाणटिवळा, शराटी, चमच्या, चक्रवाक, थापट्या, मळगुजा इत्यादी अनेक पक्षी इथे दिसून येतात. पशुपक्षांची अतिशय समृद्ध जीवनसाखळी इथे नांदते आहे. पक्षी निरीक्षणासाठी इथे अनेक मार्गदर्शक, अत्याधुनिक दुर्बिणी, निरीक्षण मनोरे आहेत. सिंचन विभाग आणि शासनातर्फे इथे निवास आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ म्हणून लोणार सरोवराला मान्यता मिळाली. हजारो वर्षांपूर्वी अशनीपातामुळे तयार झालेल्या या विवरातील जलसाठा क्षारयुक्त आहे. लोणारचे स्वत:चे असे वेगळे पर्यावरणीय महत्व आहे. हे सरोवर लोणार अभयारण्याचा भाग आहे. सुमारे १६० प्रकारचे पक्षी, ४६ प्रकारचे सरीसृप आणि लांडग्यासहीत १२ प्रकारचे सस्तन प्राणी यांची इथे नोंद झालेली आहे. ठाणे खाडी ही महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ म्हणून प्रस्ताव विचाराधीन आहे. फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून त्यास आधीच मान्यता मिळाली आहे. लवकरच त्यालाही रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळेल अशी आशा आहे.

वनस्पती आणि त्यांच्या आधाराने राहणारे इतर जीव यांनी पाणथळ जागा समृद्ध असतात. याशिवाय खारपर्णींपैकी एलोडिया-सेरोटोफायलम, लेम्ना-वुल्फिया-आयकॉर्निया, रामबाण, तिवर-सुंदरी यांचाही पाणथळ जागांमध्ये निवास असतो. याशिवाय रामसर जागांचे इतरही काही महत्व आहे. पावसाच्या पाण्याबरोबर येणार कचरा सामावून घेणे, त्याचे नैसर्गिकरित्या विघटन करून, त्यातील खनिजद्रव्ये जीवजंतूंना उपलब्ध करून देणे, याशिवाय जलशुद्धीकरण, पुरापासून संरक्षण, जमिनीची धूप आटोक्यात ठेवणे यासाठीही रामसर स्थळे सहाय्य करतात. भूजल पुनर्भरण, सूक्ष्म पर्यावरणाचा समतोल राखणे अशा प्रक्रिया रामसर स्थळांमध्ये निसर्गत:च होत असतात. शिवाय सृष्टीसौंदर्यातही त्या भर घालतात. निसर्ग अभ्यासकांसाठी एक अनमोल ठेवा म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहू शकतो.

एकीकडे अधिकृत मान्यता मिळाल्याने होणारी प्रसिद्धी, पर्यटकांचा वाढत ओघ, आर्थिक मदत तसेच स्थानिक रहिवाशांकरता रोजगाराच्या वाढत्या संधी या सर्व चांगल्या गोष्टी घडून येतात. परंतु नाण्याची दुसरी बाजूदेखील लक्षात घेण्यासारखी आहे. कास पठार हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. यूनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यापासून पर्यटकांचा ओघ वाढून त्यास यावर घालणे कठीण झाले आहे. सोबत पर्यावरणाचे संवर्धन होण्यापेक्षा नुकसानच अधिक होत आहे. त्यामुळे रामसर स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार करण्याआधी सर्वांकष विचार होणे आवश्यक आहे. 

डॉ मोहीत विजय रोजेकर, (प्राध्यापक आणि विभागप्रमुख, जीवरसायनशास्त्र विभाग, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, ठाणे. )

 

Web Title: Ramsar / Wetlands in Maharashtra and their Environmental Significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.