संजय दत्तने केला फर्लो नियमांचा भंग
By Admin | Published: January 11, 2015 12:54 AM2015-01-11T00:54:04+5:302015-01-11T00:54:04+5:30
सिने अभिनेता संजय दत्त १४ दिवसाच्या मंजूर रजेनंतर उशिरा कारागृहात हजर झाला. त्याच्याकडून फर्लो नियमांचा भंग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीनुसार
गुन्हा दाखल होण्याची तरतूद : शिक्षेचा कालावधी वाढण्याची शक्यता
नागपूर : सिने अभिनेता संजय दत्त १४ दिवसाच्या मंजूर रजेनंतर उशिरा कारागृहात हजर झाला. त्याच्याकडून फर्लो नियमांचा भंग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीनुसार तो कारवाईस पात्र आहे, असे स्पष्ट मत मुंबई बॉम्बस्फोट खटला चालविणारे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आज लोकमतशी बोलताना मांडले. एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने अॅड. निकम आज नागपुरात आले होते. त्याअनुषंगाने त्यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने चर्चा केली.
अॅड. निकम यांनी यावेळी फर्लोचा नियम आणि महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीचा हवाला देत म्हटले की, कारागृहातील कैदी त्याच्या कुटुंबीयांपासून आणि समाजापासून दुरावू नये म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून कैद्यासाठी एक तरतूद करण्यात आली. यानुसार, शिक्षा झालेल्या कैद्याला वर्षातून एकदा १४ दिवसांची रजा मागण्याचा अधिकार असतो. (म्हणजे, त्याला शिक्षेतून सूट मिळत नाही.) या १४ दिवसांच्या रजेदरम्यान अपवादात्मक स्थितीत संबंधित कैद्याला पुन्हा १४ दिवसांची पॅरोल (सलगपणे) रजा मिळू शकते. मात्र, त्यासाठी ठोस कारण हवे. ही वाढीव रजा देण्याचा निर्णय कारागृहाचे डीआयजी घेऊ शकतात. वाढीव रजेच्या कारणांची चौकशी आणि पोलिसांचा अहवाल मागून या वाढीव रजेसंदर्भात डीआजी निर्णय घेतात. या अर्जावर निर्णय झाला नसेल तर, यापूर्वी मंजूर झालेल्या फर्लो रजेच्या १४ दिवसानंतर कैद्याने तातडीने कारागृहात परतणे बंधनकारक आहे. सदरच्या अर्जावर निर्णय झाला नाही किंवा त्याची माहिती मिळाली नाही, ही सबब पुढे करून कारागृहात परतणे संबंधित कैदी टाळू शकत नाही. असे कुणी कैदी करीत असेल तर तो तरतुदीचा गैरवापर करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यात भारतीय दंड विधानाच्या कलम २२४ अन्वये दंडात्मक कारवाईस पात्र ठरतो. एवढेच नव्हे तर फर्लो तरतुदीचा भंग करणाऱ्या कैद्याविरुद्ध तुरुंगाधिकारी आयपीसीच्या कलम २२४ अन्वये पोलिसांकडे तक्रार करू शकतात आणि संबंधित कैद्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. संजय दत्तच्या प्रकरणात असाच प्रकार झाला. त्यामुळे तो कारवाईस पात्र असल्याचे अॅड. निकम म्हणाले. (प्रतिनिधी)
‘माफी‘लाही कात्री
प्रत्येक कैद्याला ज्याप्रमाणे वर्षभरात एकदा फर्लो तरतुदीनुसार १४ दिवसांची रजा उपभोगण्याचा अधिकार आहे. त्याच प्रमाणे त्याला त्याच्या शिक्षेतून प्रत्येक महिन्यात ७ दिवसांची सुट (माफी) ही मिळत असते. मात्र, फर्लोची १४ दिवसांची रजा उपभोगल्यानंतर तो लगेच कारागृहात परतला नसेल तर त्याने फर्लो तरतुदीचा भंग केल्याचे मानले जाते. अशा कैद्याला ‘त्या‘ १४ दिवसानंतर जेवढे दिवस तो कारागृहातून बाहेर असेल तेवढ्या दिवसाची प्रत्येक दिवसाला ५ या प्रमाणे त्याच्या माफीचे (सूट) दिवस रद्द होऊ शकतात, असेही अॅड. निकम यांनी सांगितले.