नाट्य प्रशिक्षण संस्थांतील आत्माच हरविलेला : सुरेश शर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:20 IST2020-02-08T00:17:10+5:302020-02-08T00:20:34+5:30
महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये असलेले नाट्यप्रशिक्षण विभाग आत्मा हरविलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून नाट्यदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय नाट्य विद्यालयालाच (एनएसडी) प्राधान्य देत असल्याच्या भावना विद्यालयाचे संचालक प्रो. सुरेश शर्मा यांनी व्यक्त केल्या.

नाट्य प्रशिक्षण संस्थांतील आत्माच हरविलेला : सुरेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बंगाल आणि महाराष्ट्राप्रमाणे उत्तर भारतात हिंदी रंगभूमी विकसित झालेली नाही. मात्र, महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये असलेले नाट्यप्रशिक्षण विभाग आत्मा हरविलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून नाट्यदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय नाट्य विद्यालयालाच (एनएसडी) प्राधान्य देत असल्याच्या भावना विद्यालयाचे संचालक प्रो. सुरेश शर्मा यांनी व्यक्त केल्या.
एनएसडीच्या २१व्या भारत रंग नाट्य महोत्सवाचे नागपुरातील उद्घाटन रविवारी ९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शंकरनगरातील साई सभागृहात होत आहे. त्याअनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत शर्मा बोलत होते. याप्रसंगी एनएसडीचे तज्ज्ञ सदस्य डॉ. विनोद इंदूरकर व डॉ. राजन उपस्थित होते.
नाट्य प्रशिक्षण संस्थांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रात्यक्षिकांचे धडे देणे गरजेचे आहे. नाटक हे पुस्तकी नव्हे तर प्रायोगिक असते. त्याचाच अभाव दिसून येतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या प्रशिक्षण संस्थांमधून विद्यार्थी तयार होत आहेत. मात्र, ते विकसित नसल्याने, त्यांची मागणी वाढत नाही. म्हणूनच, शाळांमध्ये नाटक हा अभ्यासाचा विषय व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचा अभ्यासक्रमही निर्धारित करण्यात येत आहे. गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले, जिथे नाटक हा शाळांमध्ये अभ्यासाचा विषय म्हणून स्वीकारण्यात आल्याचे प्रो. सुरेश शर्मा यावेळी म्हणाले. एनएसडीतर्फे लवकरच नाट्यलेखनविषयक उपक्रम एफटीआयच्या सहयोगाने सुरू करणार आहोत. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ‘भारत रंग महोत्सवात’ देशविदेशातील नाटके सादर होणार असून, वातावरणनिर्मितकरिता नागपुरातील रंगकर्मींकडून दररोज २० मिनिटांची लघुनाटके सादर होणार असल्याचेही शर्मा म्हणाले.