ट्रकवाल्यांनी रोखला एसटीचा मार्ग; दीड लाख प्रवाशांना फटका
By नरेश डोंगरे | Updated: January 1, 2024 20:44 IST2024-01-01T20:44:16+5:302024-01-01T20:44:48+5:30
काहींनी दुचाकी काढली तर काहींनी निवडला रेल्वेचा मार्ग : वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि भंडारा मार्ग प्रभावित : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या बस फेऱ्याही रद्द

ट्रकवाल्यांनी रोखला एसटीचा मार्ग; दीड लाख प्रवाशांना फटका
नरेश डोंगरे
नागपूर : नव्या कायद्याच्या भीतीमुळे ट्रकचालकांनी शहराबाहेरच्या मार्गावर ट्रक उभे करून आंदोलन सुरू केल्याने उपराजधानीला जोडणाऱ्या वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती आणि भंडारा मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली. राज्यातील विविध गावांना जाणाऱ्या तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या बस फेऱ्याही रद्द कराव्या लागल्या. परिणामी एसटीच्या सुमारे दीड लाख प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
अनेक ट्रकचालक अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवितात. रस्त्यावरच्या व्यक्ती, वाहनाला धडक दिल्यानंतर त्याला तसेच जखमी अवस्थेत सोडून पळून जातात. अशा बेपर्वा ट्रकचालकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने 'हिट अॅन्ड रन' नवीन कायदा काढला आहे. या कायद्यामुळे ट्रकचालकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रकचालक, ट्रान्सपोर्टर्सनी विरोध प्रदर्शीत करण्यासाठी विविध मार्गावर आज आंदोलन सुरू केले. परिणामी वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि भंडारा मार्गावरची एसटी सेवा प्रभावित झाली. एवढेच नव्हे तर नागपूरहून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या छिंदवाडा, शिवणी, इंदोर, नारायणवार पिपला, नागपूर ते लालबर्रा, राजनांदगाव, गोंदिया
मार्गावरच्या बस फेऱ्याही रद्द करण्यात आल्या. परिणामी विविध गावांना जाणाऱ्या तसेच त्या गावांतून नागपुरात येणाऱ्या सुमारे दीड लाख प्रवांशाना फटका बसला. बसमधून नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या अनेक प्रवाशांचाही यात समावेश होता. दरम्यान, या रस्ता रोकोची कल्पना नसल्याने प्रवासाला निघालेल्यांपैकी ज्यांना अति महत्वाचे काम होते, अशांपैकी कुणी दुचाकी काढून बाहेरगावी जाण्याचा मार्ग धरला, कुणी रेल्वे गाठून ऐच्छिक ठिकाण गाठले. तर, काहींनी बाहेरगावी जाण्याचा बेत काही वेळेसाठी रद्द केला.-----
वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप
शहराच्या सिमेवर सकाळी ८ वाजल्यापासूनच रस्ता बंद असल्याने नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेकांची मोठी कोंडी झाली. रस्ता बंद असल्याने पुढे जाता येत नव्हते आणि मागूनही अनेक वाहने उभी झाल्याने परतही फिरता येत नव्हते. त्यामुळे अनेकांनी बसल्या जागीच आंदोलन संपण्याची वाट बघितली. काहींनी आपापल्या बॅग हाताता घेऊन पायीच आंदोलनस्थळ पार केले आणि नंतर मिळेल त्या वाहनांनी शहरात प्रवेश केला.
------
विविध आगारातील बसच्या रद्द झालेल्या फेऱ्या
गणेशपेठ - २५४० किलोमिटरच्या १६ फेऱ्या रद्द
वर्धमाननगर - ९६० किलोमिटरच्या ८ फेऱ्या रद्द
घाटरोड - ३५८९ किलोमिटरच्या ४६ फेऱ्या रद्द
इमामवाडा - ७७६ किलोमिटरच्या ६ फेऱ्या रद्द
उमरेड - १५५० किलोमिटरच्या१६ फेऱ्या रद्द
काटोल - ५७५ किलोमिटरच्या ४ फेऱ्या रद्द
सावनेर - ३६४ किलोमिटरच्या ७ फेऱ्या रद्द