पेंचचा जलस्तर खालावला
By admin | Published: January 6, 2015 01:01 AM2015-01-06T01:01:52+5:302015-01-06T01:01:52+5:30
पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला
पाणीटंचाईचे संकेत : पाण्याच्या पातळीत आठवडाभरात २ मीटरने घट
चंद्रशेखर गिरडकर - पारशिवनी
पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. ऐन हिवाळ्यात जलसाठा घटल्याने उन्हाळ्यात या शहरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता सध्या तरी निर्माण झाली आहे.
पेंच प्रकल्पातील जलसाठ्याची प्रत्येक आठवड्यात तपासणी केली जाते. या प्रकल्पात पावसाळा संपल्यानंतर १६ मीटर जलसाठा उपलब्ध होता. मागच्या आठवड्यातील पाहणीत हा जलसाठा १७ मीटर असल्याचे आढळून आले होते. चालू आठवड्यात हा जलसाठा २ मीटरने घटला असून, तो १४ मीटर शिल्लक असल्याचे आढळून आले.
पेंच प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीची लांबी २०११ मीटर असून, सांडव्याची २३६४ मीटर व उंची ४४.५० मीटर आहे. या प्रकल्पाचा डावा कालवा मौदा तालुक्यातून भंडारा जिल्ह्यात गेला असून, हा कालवा ४८.५० कि.मी. लांब आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची व्याप्ती ही ३८८ वर्गमीटर आहे. उजवा कालवा कोराडीला आला असून, या कालव्याची लांबी ३२.८५ कि.मी. आहे. डाव्या कालव्यातून ९० घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून, उजव्या कालव्यातून प्रति सेकंद १८.४ घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो.
उजव्या कालव्याद्वारे कोराडी औष्णिक वीज प्रकल्प खापरखेड्यातील वीज प्रकल्प आणि नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नरसिंहराव उपसा जलसिंचन योजना व सत्रापूर जलसिंचन योजनेलाही या प्रकल्पातील पाणी दिले जाते. सध्या नागपूर महानगरपालिकेच्या पेंच टप्पा-४ चे काम सुरू असून, ते लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पात दरवर्षी जून महिन्यापर्यंत जलसाठा कायम राहावा, यासाठी नागपूर व मध्य प्रदेशातील जबलपूरचे जिल्हाधिकारी या प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करतात. या नियोजनांतर्गत दरवर्षी या प्रकल्पातील पाणी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील रबीच्या पिकांसाठी (सिंचन) तीन ते चारवेळा पाणी सोडले जाते. पाण्याचा घटता स्तर तसेच मे व जून महिन्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता, केवळ दोनवेळा सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.