तूर डाळींच्या किमतीवर नियंत्रण कुणाचे? सामान्यांची खरेदी थांबली

By मोरेश्वर मानापुरे | Published: May 4, 2024 10:16 PM2024-05-04T22:16:51+5:302024-05-04T22:39:16+5:30

मागणी व पुरवठ्यात तफावत : साठेबाजांवर कारवाईची ग्राहक संघटनांची मागणी, मे महिन्यात १३ रुपयांची वाढ

Who controls the price of tur pulses Common purchases stopped | तूर डाळींच्या किमतीवर नियंत्रण कुणाचे? सामान्यांची खरेदी थांबली

तूर डाळींच्या किमतीवर नियंत्रण कुणाचे? सामान्यांची खरेदी थांबली

 

नागपूर : मागणी आणि पुरवठ्यात कमालीची तफावत असल्यामुळे यंदा तूर डाळीचे भाव वाढले आहेत. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात किलोमागे १० ते १३ रुपयांची वाढ झाली आहे. कॉर्पोरेट कंपन्या आणि घाऊक व्यापाऱ्यांनी कच्चा आणि प्रोसेस तूर डाळीचा मोठा साठा केल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप असून साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी आहे. या निमित्ताने दरवाढीवर नियंत्रण कुणाचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नानंतरही डाळींचे भाव वाढतच आहेत. विशेषत: तूर डाळीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने स्टॉक लिमिट आणल्यानंतरही भाव कमी होताना दिसत नाही. त्याचा फटका गरीब व सामान्यांना बसला असून त्यांनी खरेदी थांबविली आहे. 
गोडावून, कोल्ड स्टोरेज, स्टॉक रजिस्टरची तपासणी
किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा आणली. पण सरकारी अधिकारी निवडणुकीत व्यस्त असल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. याच कारणांनी एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात तूर डाळीचे दर दर्जानुसार १६० ते १७५ रुपयांवर पोहोचले आहेत. सोबतच हरभरा आणि मूग डाळीच्या किमतीही तेजीत आहेत. आणखी दरवाढीची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 
तूर डाळींचा साठा वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहन
डाळींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांसह घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना वेबसाईटवर तूर आणि तूर डाळींचा साठा अपलोड करण्यासह स्टॉक रजिस्टर भरणे बंधनकारक केले आहे. शिवाय अपलोड केलेल्या स्टॉक रजिस्टरचे प्रिंट आऊट दुकानात ठेवायचे आहे. केंद्र आणि राज्याच्या अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान द्यायचे आहे.
तूर डाळीची आयात
तुरीचे उत्पादन भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात होते. जगात डाळी उत्पादनात भारताचा वाटा २५ टक्के वाटा आहे. पण मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी तूर डाळ आयात करावी लागते. प्रामुख्याने मसूर, तूर आणि उडीद म्यानमार, पूर्व आफ्रिकन राष्ट्रे, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथून आयात केली जाते.
डाळींचे भाव (प्रति किलो):
डाळ एप्रिल महिना मे महिना
तूर डाळ १४८-१६२ १६०-१७५
हरभरा डाळ ६४-७४ ७४-८४
उडद मोगर १२२-१४५ १२२-१४५
मूग मोगर ९५-१०० १००-१०५
मसूर डाळ ८०-८५ ८०-८५

मुख्यत्वे तूर डाळीच्या वाढत्या किमतीमुळे व्यवसायावर परिणाम झाला असून गुंतवणूक वाढली आहे. शिवाय साठ्यावर मर्यादा आल्या आहेत. गेल्यावर्षी दर्जेदार तूर डाळ १०० रुपयांच्या आत होती. सध्या कळमन्यात वऱ्हाडी फटक्याचे प्रति किलो दर १७५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांची खरेदी कमी झाली आहे.
रमेश उमाठे, धान्य व्यापारी, कळमना न्यू ग्रेन मार्केट.

Web Title: Who controls the price of tur pulses Common purchases stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर