वनसंपदेवरील आघात नागपूरकरांनी का म्हणून सहन करायचा? ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:47+5:302021-06-02T04:07:47+5:30
नागपूर : अजनीवनातील झाडे न ताेडण्याच्या केंद्रीय मंत्र्याच्या आश्वासनानंतर शांत झालेले अजनीवन वाचविण्याचे आंदाेलन पुन्हा पेट घेत आहे. एनएचएआयच्या ...
नागपूर : अजनीवनातील झाडे न ताेडण्याच्या केंद्रीय मंत्र्याच्या आश्वासनानंतर शांत झालेले अजनीवन वाचविण्याचे आंदाेलन पुन्हा पेट घेत आहे. एनएचएआयच्या कामांतर्गत महापालिकेच्या उद्यान विभागाने अजनीवन व परिसरातील ४,९३० झाडे ताेडण्यासाठी केलेल्या जाहिरातीमुळे आंदाेलनाला हवा मिळाली असून जनमानसामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वृक्षताेडीचे हे फर्मान थाेपविण्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिकांनी आंदाेलनाचा पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचएआय)च्या माध्यमातून अजनी रेल्वे स्टेशनला लागून इंटर माॅडेल स्टेशन (आयएमएस) प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी हजाराे झाडांचा बळी जात असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीन महिन्यापेक्षा अधिक काळ आंदाेलन केले. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी झाडे संवर्धनाचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले हाेते. मात्र आता पुन्हा मनपाच्या माध्यमातून वृक्षताेडीचे फर्मान निघाले आहे. उल्लेखनीय म्हणजे ४,९०० झाडे पहिल्याच टप्प्यातील आहेत तर मग चारही टप्प्यात किती हजार झाडे छाटली जातील, असा संतप्त सवाल केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी एल्गार पुकारला आहे.
४ नाही ४० हजाराच्या झाडांची कत्तल
एनएचएआय आणि महापालिका नागपूरकरांना अंधारात ठेवून काम करीत आहे. खरंतर उद्यान विभागाने काढलेली वृक्षताेडीची जाहिरात ही पहिल्या टप्प्याची आहे. पहिल्याच टप्प्यात आयएमएसच्या इमारतीच्या बांधकामांतर्गत ४,९०० झाडे कापली जाणार आहेत. इमारतीनंतर सभाेवतालच्या परिसराच्या विकासासाठीही वृक्षताेड करावी लागेल. ४५० एकर परिसरामध्ये चार टप्प्यात हे काम हाेणार असून, यासाठी जवळपास ४० हजार झाडे ताेडली जाणार आहेत. ही बाब लपवून हळूहळू झाडे कापण्याचे षडयंत्र असल्याचे पर्यावरणवादी जयदीप दास यांनी सांगितले.
मनपाकडे तक्रार अभियान
पर्यावरण कार्यकर्ता कुणाल माैर्य यांनी सांगितले, मनपाने नाेटीस दिल्याच्या सात दिवसापर्यंत आक्षेप व तक्रारी मागविल्या आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त लाेकांना वृक्षताेडीविराेधात चाललेल्या अभियानाशी जाेडून आक्षेप नाेंदविण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. ऑनलाईन व्यवस्था नसली तरी आम्ही सर्व मिळून मनपा कार्यालयात तक्रार नाेंदविण्यासाठी जाणार असल्याचे माैर्य यांनी सांगितले.
स्वाक्षरी अभियान सुरू ()
दरम्यान, अजनीवन वाचवा अभियानाला बळ देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त संदेश सिंगलकर व नितीन साठे यांनीही उडी घेतली आहे. मंगळवारी त्यांनी ट्रॅफिक पार्क परिसरातून स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केली. याला अधिक व्यापक केले जाणार असून या संपूर्ण स्वाक्षऱ्या मनपाकडे देणार असल्याचे सिंगलकर यांनी सांगितले.
साेशल मीडियावर महापाैर, नगरसेवक लक्ष्य
यादरम्यान तरुणांनी अजनीवन वाचविण्यासाठी वृक्षताेडीविराेधात साेशल मीडियावर कॅम्पेन चालविले आहे. ‘हॅशटॅग सेव्ह अजनीवन’द्वारे वृक्षताेडीच्या मनपाच्या भूमिकेचा विराेध करीत महापाैरांना बाेलण्याचे आवाहन केले जात आहे. महापाैर नागरिकांच्या भावनांचा अनादर करीत असल्याचा आराेपही केला जात आहे. तसेच १५६ नगरसेवकांपैकी कुणीही याविषयी आवाज करीत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.