धान्य घोटाळ्यातील आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:30 IST2019-05-18T00:28:51+5:302019-05-18T00:30:07+5:30
दहा महिन्यांपासून राज्यभर गाजणाऱ्या धान्य घोटाळा प्रकरणातील चार आरोपींचा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांची आता हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

धान्य घोटाळ्यातील आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी
नांदेड : दहा महिन्यांपासून राज्यभर गाजणाऱ्या धान्य घोटाळा प्रकरणातील चार आरोपींचा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांची आता हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दहा महिन्यांपूर्वी कृष्णूर येथे मेगा इंडिया अॅग्रो कंपनीत शासकीय वितरण व्यवस्थेतील धान्य जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक बडे मासे सहभागी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. तपासावेळी पोलीस आणि महसूल प्रशासन या दोन विभागामध्ये अहवाल युद्ध चांगलेच रंगले होते. परंतु दरम्यानच्या काळात या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडे देण्यात आला होता. परंतु तपासात प्रगती होत नव्हती. तसेच आरोपींना अटकही करण्यात येत नव्हती. गुप्तचर विभागाच्या या तपासावर उच्च न्यायालयाने चांगलेच ्नखडसावले होते. त्यानंतर दुसºयाच दिवशी या प्रकरणात मेगा इंडियाचे अजयकुमार बाहेती, जयप्रकाश तापडिया, वाहतूक कंत्राकदार राजू पारसेवार, हिंगोलीचे ललीतराज खुराना यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, नायगाव न्यायालयाने या चारही जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळत त्यांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. परंतु सध्या नांदेड कारागृहाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे इतर जिल्ह्यातील कारागृहात आरोपी पाठविण्यात येत आहेत़