जिल्ह्यातील 24 हजार शेतकऱ्यांचे 189 कोटी रूपये कर्जमाफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:03 AM2020-12-20T11:03:47+5:302020-12-20T11:03:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील २४ हजार ७९० शेतकऱ्यांचे १८९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील २४ हजार ७९० शेतकऱ्यांचे १८९ कोटी ४१ लाखाचे कर्ज माफ झाले आहे. यामुळे नव्याने कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने २०२१ च्या खरीप हंगामात शेतक-यांना बँकांकडून कर्ज घेत शेती करणे अधिक सोपे होणार आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. पूर्वीचे कर्ज थकल्याने लहान शेतकऱ्यांना बियाणे आणि खतासाठी नवीन कर्ज घेणे शक्य नव्हते. यात शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील २४ हजार हजार ७९० शेतकऱ्यांचे १८९ कोटी ४१ लाखाचे कर्ज माफ झाले आहे. यामुळे नव्याने कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने २०२१ च्या खरीप हंगामात शेतक-यांना बँकांकडून कर्ज घेत शेती करणे अधिक सोपे होणार आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. पूर्वीचे कर्ज थकल्याने लहान शेतकऱ्यांना बियाणे आणि खतासाठी नवीन कर्ज घेणे शक्य नव्हते. यात शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी राज्य शासनाकडून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात शेतक-यांनी घेतलेले थकीत असलेले २ लाखापर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक पुनर्गठित कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. यानुसार जमीनधारणेचे क्षेत्र विचारात न घेता कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. केवळ आधार प्रमाणिकरण करून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात मोहिम स्तरावर रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे बँकेतून नव्याने कर्ज घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले. यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कर्जमुक्त झालेल्या आणि नव्याने सभासद झालेल्या २५ हजार ३६२ शेतकऱ्यांना खरीप हंगामा २०२० या काळात २७५ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच सोबत १ हजार १४९ शेतक-यांना १४ कोटींचे पीक कर्ज रब्बी हंगामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शासनाकडून करण्यात आलेल्या कर्जमुक्तीमुळे शेतक-यांना येत्या काही वर्षात नव्याने पीक कर्ज घेण्यास घेण्यात अडचणी येणार नसल्याचे बोलले जात आहे. बँकांकडून येत्या काळात वेळेत कर्जवाटप करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मुदतीत ११ हजार शेतक-यांनी परत केले कर्ज
एकीकडे कर्जमुक्ती मिळाली असताना दुसरीकडे मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत ११ हजार शेतक-यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पीक कर्ज घेत वेळेत परत करणा-या शेतक-यांना १ लाखापर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते. २०१९-२० या वर्षात ११ हजार ७०९ शेतक-यांना १ कोटी ८१ लाख रूपयांच्या सवलतीचा लाभ देण्यात आला आहे. यांतर्गत नंदुरबार तालु्क्यातील ३ हजार ३ शेतक-यांना ४४ लाख ३२ हजार रूपये, शहादा तालुक्यात ५ हजार ७२२ शेतक-यांना ९३ लाख ५४ हजार, नवापूर तालुक्यात १ हजार ७३० शेतक-यांना २४ लाख ५२ हजार, तळोदा येथे १ हजार १८ शेतक-यांना १७ लाख ६६ हजार, अक्कलकुवा ७३ शेतक-यांना ६५ हजार तर धडगाव तालुक्यात १६३ शेतक-यांना ९५ हजार रूपयांच्या सवलतीचा लाभ देण्यात आला आहे.