सरपंचपदासाठी 42 लाखांची बोली, ग्रामपंचायतीची सत्ताही मिळणार, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 04:59 AM2020-12-24T04:59:33+5:302020-12-24T07:01:46+5:30
Gram Panchayat : साधारणत: पाच हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. चार प्रभाग आणि १३ सदस्य असलेल्या या गावात यंदा निवडणूक बिनविरोध करावी, असे काहींचे म्हणणे पडले.
- मनोज शेलार
नंदुरबार : वाघेश्वरी माता देवीवर श्रद्धा आणि एकदातरी सरपंचपद घरात यावे यासाठी गावातील मंदिराला तब्बल ४२ लाख रुपयांची देणगी देऊन पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सांभाळण्याची तयारी खोंडामळी येथील प्रदीप वना पाटील यांनी दर्शविली. खोंडामळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा लिलाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
साधारणत: पाच हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. चार प्रभाग आणि १३ सदस्य असलेल्या या गावात यंदा निवडणूक बिनविरोध करावी, असे काहींचे म्हणणे पडले. त्यासाठी गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीला जो जास्त देणगी देईल त्याच्याकडे ग्रामपंचायत
सुपूर्द करावी, असे ठरविण्यात आले. यासाठी अनेक भक्त पुढे सरसावले. सर्व पक्षांतील इच्छुकांनी त्यासाठी बोली लावली. २५ लाखांपासून ३८ लाखांपर्यंत बोली गेली. ग्रामपंचायत एकदा तरी आपल्या ताब्यात यावी आणि सरपंचपद आपल्या घरात यावे यासाठी प्रदीप वना पाटील यांनी इच्छा व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पाटील यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनीही प्रोत्साहन दिले, आणि ४२ लाखांवर त्यांनी बोली लावून ती अंतिम केली. या पैशातून मंदिराची उभारणी केली जाणार आहे.
याशिवाय पाटील हे ठरवतील
तेच सदस्य बिनविरोध घेतले
जाणार आहेत. त्यांना चार अपत्ये असल्याने ते स्वत: किंवा त्यांच्या
पत्नी सदस्य किंवा सरपंचपदासाठी
पात्र ठरू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीला सरपंचपदावर विराजमान करावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या लिलाव प्रक्रियेची चर्चा जिल्हाभर आहे. गावातील काही घटकांनी याला आक्षेप घेतला. परंतु गाव विकासासाठी व गावाच्या एकीसाठी त्यांचाही विरोध मावळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काय घडामोडी घडतात याकडे आता लक्ष लागून आहे.
प्रदीप पाटील यांची देवीवर श्रद्धा आणि पंचायत आपल्याकडे यावी अशी अपेक्षा होती. तसे त्यांनी आपल्याकडे बोलून दाखविले. त्यांना लागलीच होकार दिला. त्या माध्यमातून त्यांनी ही बोली लावली. गाव विकासासाठी सर्व जण एकत्र आल्याने आनंद आहे.
- डॉ. अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस, नंदुरबार.