आसाणे ग्राम पंचायतीत 40 लाखांची रोजगार निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 01:08 PM2020-12-27T13:08:45+5:302020-12-27T13:08:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोजगार हमी योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक ठरत आहे. शेतकऱ्यांना बांधावर हेक्टर २० आंब्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रोजगार हमी योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक ठरत आहे. शेतकऱ्यांना बांधावर हेक्टर २० आंब्यांच्या लागवडीसाठी अंदाजे ३२ हजार रुपये मंजुरी मिळाली आहे. यातून नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथे ४० लाख रुपयांची रोजगार निर्मिती ग्रामपंचायतीने केली आहे.
तालुक्यातील आसाणे येथील सरपंच चंद्रकांत पाटील यांनी रोजगार हमी योजनेतून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला व कृषी विभागामार्फत बांधावर फळबाग लागवडीसाठी सागर पाटील यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितला. यासाठी लागणारे इस्टिमेंट कृषी सहायक बादल बंजारा यांनी केले. यावेळी गावातून ११४ प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून तालुका कृषी अधिकारी रामू पवार यांना तांत्रिक मंजुरी देण्याचे आदेश दिले.
प्रशासकीय मान्यता उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी दिली. शेतकऱ्यांना बांधावर हेक्टरी २० आंब्यांची लागवड करण्यासाठी अंदाजे ३२ हजार रुपये मंजुरी मिळाली आहे. यातून आसाणे गावात तब्बल ४० लाख रुपयांची रोजगार निर्मिती ग्रामपंचायत करू शकली आहे.
गांडुळ युनिटसाठी शेतकऱ्यांना निधी मंजूर
प्रथम वर्षाला शेतकऱ्यांना अंदाजे १८ हजार रूपये मिळतील. वर्षाला सात हजार रूपये व तिसऱ्या वर्षाला सात हजार रूपये मिळतील. फळबाग लागवडीसाठी मंडळाधिकारी पी.एच. धनगर व एम.जी. धोत्रेे यांनी शेतकऱ्यांना लागवडीसाठी व झाडांचे संगाेपन करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. मागील वर्षी राेजगार हमी योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला गांडूळ युनिटसाठी प्रत्येकी १० हजार रूपये मंजूर करून दिले होते. त्यातून गावात आठ लाख रूपयांचा रोजगार निर्माण करण्यात आला होता. या गांडूळखता शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होत आहे. भविष्यात जास्तीचे खत तयार करून शेतकरी गटामार्फत पॅकिंग करून बाजारात विकण्यासाठी ग्रामपंचायत योजना करीत आहे.
भविष्यात प्रत्येक योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे. शेतकऱ्यांना शेती जोडव्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काम करणार आहे. -चंद्रकांत पाटील, सरपंच, आसाणे