मुस्कानने 241 बालकांना केले पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:16 PM2020-12-20T12:16:04+5:302020-12-20T12:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलिसांच्या ‘मुस्कान’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अपहृत, हरवलेले, भिक्षा मागणारे व इतर असे आतापर्यंत तब्बल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोलिसांच्या ‘मुस्कान’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अपहृत, हरवलेले, भिक्षा मागणारे व इतर असे आतापर्यंत तब्बल २४१ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. यंदाची ही नववी मोहिम असून तिचा समारोप ३१ डिसेंबरला होणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हा पोलीस दलातर्फे वेगळे पथक नियुक्त करण्यता आले असून यासाठी बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थांचेही सहकार्य घेण्यात येत आहे.
राज्यात २०१४ पासून ॲापरेशन मुस्कान ही मोहिम दरवर्षी १ ते ३१ जुलै या दरम्यान राबविली जाते. या मोहिमेअंतर्गत अपहृत अल्पवयीन बालके, बेवारस, भिक मागणारे, कचरा गोळा करणारे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचीत राहणाऱ्या अल्पवयीन मुुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे किंवा बालसंरक्षणगृहे यांच्याकडे सुपुर्त करण्यात येत असतात. यानुसार आतापर्यंत एकुण आठ मोहिमा राबवून अनेक बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राज्यासह जिल्हा पोलीस दलाने केला आहे.
यंदा जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपुर्ण जिल्ह्यात नववी मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत तिचा समावेश आहे. त्यात प्रत्येक पोलीस ठाण्यातून एक अधिकारी, चार अंमलदारांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आलेले आहे. याशिवाय जिल्हा बालकल्याण समिती, जिल्ह्यातील बाल संरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था, बाल पोलीस पथकातील अधिकारी, अंमलदार यांचादेखील सदर मोहिमेत सहभाग आहे. पोलीस अधीक्षकांनी समन्वय बैठका घेऊन जिल्ह्यात मोहिम यशस्वीपणे राबविली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार, सर्व उपअधीक्षक व पोलीस ठाणे प्रभारी यांचा त्यात सहभाग होता.
२५ हरविलेल्या बालकांचाही समावेश
या कार्यवाहीमध्ये अपहृत किंवा पळून गेलेली तीन बालके. हरविलेले २५ बालके यांच्यासह बालकामगार, भिक्षा मागणारे, भंगार गोळा करणारे असे एकुण २४१ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले.
जिल्ह्यातील रेल्वेस्थानके, बसस्थानके, धार्मिक स्थळे, हाॅटेल्स, ढाबे या ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात आली होती. याशिवाय पळून गेलेली किंवा अपहृत बालकांना विशेष तपास पथकांकडून शोधण्यात आले.