ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बिनविरोधला फाटा, सर्वच ठिकाणी निवडणूक रंगण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:21 PM2020-12-20T12:21:18+5:302020-12-20T12:21:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत वगळता एकही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत वगळता एकही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. आता देखील ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीची चुरस वाढली आहे. कोरोना, लॅाकडाऊन, अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेेले आर्थिक संकट यामुळे निवडणुका बिनविरोध कराव्या यासाठी चर्चा असली तरी निवडणुका अटळ असल्याचे चित्र आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकुण ५९५ ग्रामपंचायती आहेत. या पैकी मुदत संपलेल्या व संपणारऱ्या अशा ८७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होऊन प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाचे वर्ष हे विविध संकटांचे होते. कोरोनाने तर अनेकांचे होत्याचे नव्हते केले. शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टीने पीके हातची गेली. त्यामुळे गाव पातळीवर आर्थिक संकटाचे वातावरण आहे. परिणामी निवडणूका टाळून सामंजस्याने गावची निवडणूक बिनविरोध करावी अशी अपेक्षा अनेक ठिकाणी आहे. परंतु गाव गाड्याचे राजकारण पहाता, राजकीय पक्षांना आपली दुकानदारी टिकविण्यासाठी आणि आपल्याच गटाच्या, पक्षाच्या ताब्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायती राहाव्या यासाठी निवडणुका लढविल्या जात आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक एकाही गावाची होणार नाही हे अगदीच स्पष्ट आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कॅांग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
एकुणच वर्षभरापासून जिल्ह्यात एकही सार्वत्रिक निवडणूक झाली नसल्याने आता ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून असून यावेळी एकही ग्रामपंचायत बिनविरोध होणार नाही हे जवळपास स्पष्टच आहे.
बिनविरोधची परंपरा असलेले पुरुषोत्तमनगर एकमेव गाव
जिल्ह्यात पुरुषोत्तमनगर ही एकमेव ग्रामपंचायत बनविरोध निवडणूक होणारी आहे. या ठिकाणी सर्वच महिला सदस्यांना निवडून दिले जाते. सरपंच देखील महिलाच असते. त्यामुळे महिला राज असलेली, बिनविरोध होण्याची परंपरा असलेली ही खान्देशातील एकमेव ग्रामपंचायत असल्याचेही चित्र आहे. या टप्प्यात ग्रामपंचायतीची निवडणूक नाही.
राजकीय पक्षांना मिळाले बळ
जिल्ह्यात वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झाली होती. त्यानंतर एकही निवडणूक झाली नाही. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. तब्बल वर्षभर एकही सार्वत्रीक निवडणूक नसल्यामुळे राजकीय पक्षांमध्येही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही मरगळ होती. आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही उभारी येणार आहे. या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.