अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीची रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती
By admin | Published: November 14, 2016 02:51 PM2016-11-14T14:51:04+5:302016-11-14T14:51:04+5:30
शात राष्ट्रीय एकात्मता, मैत्री व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीत सहभागी तरुणांचा सत्कार करण्यात येईल.
मंगळवारी लोणावळा येथे रॅलीतील तरुणांचा सन्मान सोहळा
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ - देशात राष्ट्रीय एकात्मता, मैत्री व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीत सहभागी तरुणांचा मंगळवारी (दि. १५) लोणावळा येथे एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.
पंजाबमधील अशांतता, राजस्थानातील आरक्षणाचे आंदोलन अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनातर्फे नोव्हेंबर १९९१ मध्ये देशपातळीवर मैत्री सद्भाव अग्रोहाधाम मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. महाराजा अग्रसेन यांची प्रतिमा असलेला एकात्मता रथ, १८ मोटारसायकल्स, रुग्णवाहिका आदि वाहनांचा या रॅलीत समावेश होता.
पत्रकार किरण अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन व वीरेंद्र गनेडीवालसह चेअरमन असलेल्या या रॅलीचा प्रारंभ शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात दर्शन करून झाला होता. जालना, औरंगाबाद, धुळे, सुरत, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर, उदयपूर, अजमेर, जयपूर, बिकानेर, हिसार, भिवाणी, रोहोतक, मथुरा, आग्रा, वाराणसी, अयोध्या, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, नागपूर, अमरावती अशा सुमारे दोनशेपेक्षा अधिक शहरांमध्ये विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून सभा घेऊन शांती सद्भावनेचा तसेच महाराजा श्री अग्रसेन यांच्या अहिंसावादाचा संदेश या रॅलीने पोहोचविला होता. अकोला येथे या रॅलीचा समारोप झाला होता.
रॅलीतील तरुणांनी दिल्ली मुक्कामी माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, संसदेतील तत्कालीन विरोधीपक्ष नेते लालकृष्ण अडवाणी आदि मान्यवरांच्या भेटी घेतल्या होत्या. तर बोटक्लब येथे प्रख्यात सिने अभिनेते राजेश खन्ना यांच्यासह विविध मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले होते. अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे तत्कालीन अध्यक्ष बनारसीदास गुप्ता, प्रदीप मित्तल, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी, दिल्लीचे ओमप्रकाश अग्रवाल, गोपाल अग्रवाल, जगदीश खेतान, मुरारीलाल टिबडेवाला, आर.बी. अग्रवाल, कमलकिशोर गोयंका आदिंनी रॅलीच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले होते.
मंगळवारी रजत सन्मान
नोव्हेंबर १९९१ मध्ये काढण्यात आलेल्या रॅलीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यात सहभागी झालेल्या तरुणांचा लोणावळा येथे मंगळवारी एका विशेष समारंभात रजत सन्मान करण्यात येणार आहे. कॉसमॉस बॅँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध भागवत कथाकार तथा उद्योगपती महेंद्रकुमार पाटोदिया, विजयकुमार चौधरी, राजेश अग्रवाल, विनोद जालान आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सन्मान सोहळा आयोजिण्यात आला आहे.
सात राज्यांतून प्रवास
मैत्री, सद्भावना, अग्रोहाधाम रॅलीने एकूण २४ दिवसांमध्ये महाराष्ट्रासह गुजराथ, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा सात राज्यांतून सुमारे सहा हजारपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास केला होता. तसेच रॅलीप्रमुखांनी या राज्यांमध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक ठिकाणी सार्वजनिक सभा घेऊन शांती, सद्भावनेचा संदेश दिला होता.