माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:17 IST2025-03-05T13:17:16+5:302025-03-05T13:17:16+5:30
मंत्री माणिकराव कोकाटे यांना कार्टाने मोठा दिलासा दिला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. काही दिवसापूर्वी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आता कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला जिल्हा व सत्र न्यायालय यांनी स्थगिती दिली आहे.
मोठी बातमी! राज्य सरकारने दिला दिलासा; प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय काेकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत राखून ठेवलेल्या निकालाची सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीत कोकाटे बंधूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळत ही सुनावणी आज ५ मार्च रोजी घेण्यात आली. यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना कागदपत्र फेरफार अन् फसवणूक केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले होते. १९९५ ते ९७ मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप काेकाटे यांच्यावर आहे.
या निर्णयाला कोकाटे यांनी आव्हान देत शिक्षा स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत १ मार्च रोजी यासंदर्भात निकाल देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याचदरम्यान शनिवारी सकाळी ॲड. सतीश वाणी आणि आशुतोष राठोड यांनी पुन्हा शिक्षेच्या स्थगितीला आदेश देणाऱ्या याचिका दाखल करीत त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांचा दाखला दिला. त्यानुसार शिक्षेची स्थगिती उठवून आ. कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवावी, ही मागणी त्यात करण्यात आली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी स्थगिती देण्याची याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना वरिष्ठ न्यायालयात हरकत दाखल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली. तीन दिवसांत तुम्ही उच्च न्यायालयात जा अथवा ५ मार्च रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. दरम्यान, आज यावर सुनावणी झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
१९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. ३० वर्षांनी या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतिम निकाल दिला होता. यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यासह दोघांनाही न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. भारतीय दंड विधान ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.