दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:43+5:302021-06-29T04:11:43+5:30
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका वर्तविला जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून निर्बंध कडक करण्यात ...
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका वर्तविला जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून निर्बंध कडक करण्यात आले असून जमावबंदी, संचारबंदीमध्ये बदल करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. यानुसार दीपक पाण्डेय यांनी शहरात जमावबंदी, संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश देत यापूर्वी ८ जून रोजी काढलेले आदेश रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या आदेशानुसार २८ जून ते २७ जुलै या कालावधीसाठी शहरात पहाटे पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून नागरिकांनी अनावश्यकरीत्या गर्दी करू नये, तसेच संध्याकाळी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे, अन्यथा पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. संध्याकाळनंतर अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी अथवा अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी घराबाहेर पडताना आवश्यक पुरावा, मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
--इन्फो--
भरारी पथकांची नियुक्ती
विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस ठाणेनिहाय या आदेशांची अंमलबजावणी केली जात आहे किंवा नाही, याची खात्री पटविण्यासाठी आयुक्तालय स्तरावर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमार्फत तपासणी करून नियम मोडणाऱ्या व्यावसायिक किंवा नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
---इन्फो--
...असे आहेत नवे नियम
शहरातील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता) सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुल्या राहतील.
दुपारी चार वाजेनंतर अन्य आस्थापना सुरू असल्याचे आढळून आल्यास पाच हजारांचा दंड आस्थापना चालकांना करण्यात येईल.
जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी कोठेही थुंकताना आढळून आल्यास १ हजारांचा दंड केला जाणार आहे.
बाजारपेठांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यास १ हजारांचा होईल दंड
बाजारात खरेदीसाठी जाताना दिलेल्या पासवरील नमूद वेळेत ग्राहकाने खरेदी आटोपून बाजारपेठ सोडणे अनिवार्य आहे.
पासची निर्धारित वेळ संपल्यानंतर बाजारात रेंगाळताना आढळून येणाऱ्या ग्राहकांना एक हजारांचा दंड करण्यात येणार आहे.