फेरीवाल्यांचा जागा मागणीसाठी मोर्चा
By Admin | Published: November 22, 2015 12:09 AM2015-11-22T00:09:54+5:302015-11-22T00:10:14+5:30
मुख्य मार्गावर हवे फेरीवाला क्षेत्र : विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
नाशिकरोड : हॉकर्स टपरीधारक व झोपडपट्टीवासीयांच्या विविध समस्यांबाबत पीपल्स रिपाइंच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मनपाच्या माध्यमातून नाशिकला स्मार्ट सिटी उभारण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे; मात्र गोरगरीब व मध्यमवर्गीयांना अच्छे दिन दाखवून फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. या स्मार्ट सिटीमध्ये कोणते प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याची पुसटशी कल्पनादेखील लोकांना माहिती करून दिलेली नाही. शहरातील झोपडपट्टी व हॉकर्स टपरीधारकांना याचा काय लाभ होणार आहे याबाबतची माहिती दिलेली नाही.
हॉकर्स व टपरीधारकांना वर्दळीच्या ठिकाणीच व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी व त्यांना टपऱ्या वाटप करण्यात याव्या. तसेच इंदिरानगर, प्रकाश आंबेडकर, श्रमिक नगर, चव्हाण मळा ठिकठिकाणच्या झोपडपट्ट्यांमध्ये सुविधा पुरविण्यात याव्या. या ठिकाणी गटारी तुंबलेल्या असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आदिंबाबत मनपा लागलीच कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. यावेळी पक्षाचे शशिकांत उन्हवणे, संदीप काकळीज, नवनाथ कातकाडे, देविदास डोके, मिलिंद निकम, सोपान जाधव, प्रवीण जाधव, नीलेश उन्हवणे, सीताबाई कातकाडे, सुनीता कर्डक, अलका निकम, कांताबाई पाल आदिंसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)