खंडित वीजपुरवठ्यामुळे हैराण
By admin | Published: January 3, 2017 11:11 PM2017-01-03T23:11:17+5:302017-01-03T23:11:37+5:30
खेळखंडोबा : रोहित्र बदलून देण्याची मागणी
पाथरे : सिन्नर तालुक्यातील मीरगाव-पाथरे परिसरातील ईशान्येश्वर मंदिराजवळील रोहित्र बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. सदर रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. मीरगाव व पाथरे परिसरातील ईशान्येश्वर मंदिराजवळील विठ्ठल शेळके यांच्या शेतात असलेले रोहित्र दीड महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. विहिरीत पाणी असूनही पिकांना देत नसल्याचे चित्र आहे. सदर रोहित्रावरून परिसरातील सुमारे २५ विहिरींवरील कृषिपंपांची वीजजोडणी केली आहे. तथापि, खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे दुरापास्त बनले असून, गहू, हरभरा, कांदा या पिकांसह डाळींबबागा धोक्यात सापडल्या आहेत. ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती देण्यासह लेखी तक्रारही नोंदविली आहे. तरीही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. डाळींबबागा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असून, त्याच जर पाण्यावाचून उद्ध्वस्त झाल्या तर शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या वाचून राहणार नाही. त्वरित रोहित्र बदलून द्यावे अशी मागणी कॅप्टन अशोककुमार खरात, विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश हिंगे, दत्तू शिंदे, विठ्ठल शेळके, रशरद गव्हाणे, बाबासाहेब शेळके, विजय हिंगे, भागवत शेळके, रखमा शेळके, शिवाजी घुमरे, भाऊ हिंगे, नारायण हिंगे यांनी केली आहे. (वार्ताहर)