पदपथवर वाढते अपघात
By admin | Published: November 7, 2016 12:03 AM2016-11-07T00:03:01+5:302016-11-07T00:55:13+5:30
अतिक्रमणाने रस्त्यावर चालणे झाले मुश्कीले गायब
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व रस्त्यांना अतिक्रमणाचा वेढा पडला असून, दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तर सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. कारण जिकडे पहावे तिकडे टपऱ्या, हातगाड्या, पदपथावरच पथारी पसरून बसलेले विक्रेते यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सुमारे ५ ते १0 वर्षांच्या काळात शहरातील सर्व मुख्य रस्त्यालगत पेव्हरब्लॉक टाकून तयार करण्यात आलेले पदपथ तर गायबच झाले आहेत.
नाशिक शहरातील वाढत्या वाहन व्यवस्थेला, रहदारीला आणि रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना शिस्त लागावी म्हणून मुंबई-पुणे या महानगराच्या धर्तीवर गेल्या दहा वर्षांत शहरातील मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग त्याचप्रमाणे सिडको-अंबड लिंक रोड, गंगापूररोड, पंचवटी भागातील मुख्य रस्ते, सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मार्ग, नाशिकरोड, उपनगर आणि इंदिरानगर या मोठ्या वसाहतीतील रस्त्यांचे रूंदीकरण करून मध्यभागी दुभाजक टाकून दोन पदरी रस्ते तयार करण्यात आले. त्या दोन पदरी रस्त्यांच्या लगतच दोन्ही बाजूला सिमेंटचे पेव्हर ब्लॉक टाकून ठरावीक उंचीचे पदपथ तयार करण्यात आले. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महापालिका आणि राज्य शासनाच्या अन्य विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. परंतु सदर पदपथांवर सर्वप्रथम छोट्या टपरीधारकांनी आपले बस्तान मांडले. त्याचप्रमाणे लहानमोठे विक्रेतेही हे पदपथ जणू काही आपल्यासाठीच बांधले या थाटात तेथे व्यवसाय करू लागले. मग हळूहळू या सुंदर पदपथांची मोडतोड सुरू झाली. आपल्या छोट्या दुकानाच्या कनातीसाठी पेव्हरब्लॉकमध्ये खिळे ठोकणे, पेव्हरब्लॉकचा कठडा किंवा स्टूलसारखा उपयोग चहा विक्रेत्यांनी सुरू केला. त्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यालगतचे हे पथपद जणू काही गायबच झालेले दिसतात. आता तर वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यावरून पायी चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. कारण त्यांच्या एकाकडेला दुकानाची रांग तर दुसरीकडे वेगाने जाणारी वाहने यामुळे अपघातात वाढच होत आहे.