नऊ मृत्युमुखी : नाशकात ३५८ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:43 IST2021-03-09T20:40:17+5:302021-03-09T20:43:41+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिकरित्या गर्दीत अनावश्यकपणे मिसळणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर आणि सामाजिक अंतर राखण्यास प्राधान्य देणे गरजेचे

नऊ मृत्युमुखी : नाशकात ३५८ रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने फैलावताना दिसत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात तसेच ग्रामीण भागात निर्बंध कडक करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.९) शहरात नव्याने ४११ तर ग्रामिण भागात ७१. मालेगावात ४१ आणि जिल्ह्याबाहेरील १४ असे एकुण ५३७ नव्या रुग्णांची भर पडली. तसेच ३५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. यामुळे दुकाने, मंदिरांच्या वेळा, सार्वजनिक सोहळे, लग्नसमारंभ, आठवडे बाजार यांवर निर्बंध घातले गेले आहे. बुधवारपासून (दि.९) या निर्बंधाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्च महिन्याचा आठवडा पुर्ण झाला असून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने हालचाल करत कार्यवाहीला सुरुवात केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिकरित्या गर्दीत अनावश्यकपणे मिसळणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर आणि सामाजिक अंतर राखण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शहरात मंगळवारी दिवसभरात ४ तर मालेगावात २ आणि ग्रामिण भागातील ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा मृत्युचा आकडा २ हजार १४९ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत एकुण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख २७ हजार १०७वर पोहचली असून १ लाख २० हजार ५६२ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मातदेखील केली आहे. नाशिक शहरात ३ हजार ३५० रुग्ण तर मालेगावात ४१३ आणि ग्रामिण भागात ५९४ असे एकुण ४ हजार ३९६ रुग्ण उपचारार्थ वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. २ हजार ३१४ चाचण्यांचे नमुने अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.