पोलिसांकडून असहकार
By admin | Published: June 24, 2014 12:22 AM2014-06-24T00:22:22+5:302014-06-24T00:38:04+5:30
गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांचे सहकार्य मिळत भगूर : नसल्याने आता भगूरमधील ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांना विनंती करण्याची भूमिका घेतली आहे.
भगूर : येथील गावठाण जागा क्र. ९४५ अ-क वरील अनधिकृत झोपडपट्टी हटविण्यासाठी भगूर नगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत; मात्र पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने अतिक्रमण कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने आता भगूरमधील ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांना विनंती करण्याची भूमिका घेतली आहे.
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेअंतर्गत भगूर पालिकेला घरकुल योजनेसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे पालिकेच्या जागेवर असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीधारकांना हटवून तेथे घरकुल योजना बांधण्याची योजना आहे. परंतु येथील झोपडपट्टीधारक हटण्यास तयार नसल्याने घरकुल योजनाही अडचणीत आली आहे. येथील नागरिकांनी बेघर होण्याच्या भीतीने या योजनेलाच विरोध केला असून, येथील नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पालिकेने केला आहे. घरकुल योजना राबविण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने पोलीस आयुक्तांना अतिक्रमण हटविण्याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी झोपडपट्टीधारकांची बैठकही घेतली होती; मात्र अजूनही तोडगा निघू शकलेला नाही.
महानगरपालिकेने २४ जानेवारी २०१४ आणि २५ मार्च २०१४ रोजी झोपडपट्टीतील घरे काढण्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र दिले. अनेक वेळा पोलिसांकडून मदत मागितली असतानाही पोलीस आयुक्तांकडून सहकार्य मिळत नसल्याची पालिकेची तक्रार आहे. या प्रकरणी नागरिक लवकरच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असून, नाशिक पोलिसांबद्दल तक्रार करणार असल्याचे समजते. तसेच आता पावसाळा सुरू झाला ही सबब सांगून पोलीस बंदोबस्त देण्यात असमर्थता दाखवित आहेत. (वार्ताहर)