आरक्षण फेरबदलाने धक्का
By admin | Published: November 17, 2016 10:09 PM2016-11-17T22:09:57+5:302016-11-17T22:11:05+5:30
उपनगर, आगरटाकळी परिसर : मूलभूत सुविधांची ओरड कायम
पंकज पाटील नाशिक
गेल्या २५ वर्षांच्या काळात आगरटाकळी, उपनगर परिसरातील जनतेने राजकीयदृष्ट्या कधीही एकाच पक्षाला कौल दिलेला नाही. या भागात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, मनसे यांच्या जोडीला अपक्ष उमेदवारांनाही प्रभागाचा कारभार चालविण्याची संधी दिली आहे.
एकूणच या भागात कुठलाही राजकीय पक्ष कायम सत्ताधारी राहिलेला नाही. हा परिसर नेहमीच व्यक्तिकेंद्रित राहिला आहे. त्यामुळेच अपक्षांनीही या भागात अनेकवेळा संधी मिळाली आहे. मात्र नव्या प्रभाग रचनेत पूर्वीचा प्रभाग ३१ व ३७ मिळून नव्याने झालेला प्रभाग १६ हा भौगोलिकदृष्ट्या बराच मोठा झाल्याने तसेच स्लम वस्त्यांचाही परिसर मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाल्याने इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नव्याने झालेल्या प्रभागातून इच्छामणी मंदिर व नवीन चाळ परिसर वगळण्यात आल्याने विद्यमान नगरसेवकांच्या व्होट बॅँकेला धक्का पोहोचला आहे. नव्याने झालेल्या प्रभाग १६ मध्ये चार जागांपैकी अनुसूचित जाती व जमाती- साठीच्या दोन जागांवर महिलांना संधी मिळणार असून, उर्वरित एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर एक सर्वसाधारण गटासाठी असल्यामुळे ओबीसी व खुल्या गटातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे. आरक्षणाच्या फेरबदलामुळे आजी-माजी नगरसेवक हे एकमेकांसमोर उभे ठाकणार असून, सद्यस्थितीतील विद्यमान नगरसेवकांना प्रभागाची मोठी व्याप्ती तसेच मातब्बर इच्छुकांचे तगडे आव्हानदेखील राहणार आहे. नवीन प्रभागाचा परिसर हा व्यक्तिकेंद्रित मतदान करत असल्याने या ठिकाणी पॅनल टु पॅनल मतदान होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक व इच्छुकांचा चांगलाच कस लागणार आहे. तसेच नागरिकांची मूलभूत सुविधांबाबतची ओरड कायम आहे. अनेक कॉलनी रस्त्यांंची कामे रखडलेली असल्याने आगामी काळात प्रभागातील विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा ंमोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. प्रभागरचना बदलल्याने यंदा राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या लढतींमध्ये चुरस दिसून येऊ शकते. नवीन प्रभागरचनेत एस.टी. प्रवर्गासाठी प्रथमच आरक्षण पडल्याने आजी-माजी नगरसेवकांचे गणित बिघडले असून, यंदा सर्वच राजकीय पक्षांना, मातब्बर उमेदवारांना संधी देण्याबरोबरच मजबूत पॅनलची बांधणी करताना भौगोलिकदृष्ट्या समतोल सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आगरटाकळी, उपनगर व गांधीनगर परिसर मिळून नव्याने प्रभाग १६ तयार झाला असून, पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत १९९२ मध्ये अपक्ष नगरसेवक अशोक दिवे, विजय ओहोळ व कॉँग्रेसच्या वंदना मनचंदा, १९९७ मध्ये पुन्हा अपक्ष नगरसेवक अशोक दिवे व विजय ओहोळ यांच्या पत्नी सुमन ओहोळ व कॉँग्रेसच्या वंदना मनचंदा यांना कौल दिला होता. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये अपक्ष नगरसेवक अशोक दिवे यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. २००२ च्या त्रिसदस्यीय प्रभागरचनेत मतदारांनी सेना-भाजप युतीचे अनिल ताजनपुरे व उज्ज्वला हिरे व राष्ट्रवादीने जयंत जाधव यांच्या रूपाने या भागात प्रथमत:च खाते उघडले होते. २००७ द्विसदस्यीय प्रभाग रचनेत मनसेकडून विजय ओहोळ, तर कॉँग्रेसचे रमेश जाधव हे अवघ्या एका मताने विजयी झाले होते. तर कॉँग्रेसकडून माया दिवे व राष्ट्रवादीकडून प्रशांत मोरे यांनादेखील संधी मिळाली होती. २०१२च्या द्विसदस्यीय रचनेत राज ठाकरेंच्या करिष्म्यामुळे मनसेच्या सुमन ओहोळ व मेघा साळवे यांना संधी मिळाली. तर भाजपाकडून प्रा. कुणाल वाघ व कॉँग्रेसकडून राहुल दिवे निवडून आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे हे नुकतेच भाजपवासी झाले आहेत.