पेठ तालुक्यात पावसाने भाताचे नुकसान
By admin | Published: November 22, 2015 11:12 PM2015-11-22T23:12:23+5:302015-11-22T23:15:17+5:30
पेठ तालुक्यात पावसाने भाताचे नुकसान
पेठ : ऐन भात पीक कापणीच्या वेळी तालुक्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने भातासह नागली, खुरसणी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे़
गत दोन दिवसांपासून पेठ शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले असून, यामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या भात पिकात पाणी साचल्याने भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नागली, खुरासणी, वरई, उडीद आदि पिकांमध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखे झाले़ आधीच दुष्काळी परिस्थिती असताना शेतकरी मेटाकुटीला आला होता. आता त्यातच खरिपावरही कुऱ्हाड कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे़
शनिवारी व रविवारी पेठसह जोगमोडी, करंजाळी, मोहपाडा, कुंभाळे, आंबे, म्हसगण, कोहोर, कुळवंडी परिसरात पावसाने
थैमान घातले़
बेमोसमी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे़ (वार्ताहर)