ओव्हरहेड वाहिन्यांचा धोका कायम
By Admin | Published: June 27, 2017 12:34 AM2017-06-27T00:34:01+5:302017-06-27T00:34:13+5:30
नाशिक : नागपूरमध्ये ओव्हरहेड उच्चदाब वाहिनीच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बालकांना जीव गमवावा लागला, तर या घटनांना महावितरणला जबाबदार धरत अभियंत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नागपूरमध्ये ओव्हरहेड उच्चदाब वाहिनीच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बालकांना जीव गमवावा लागला, तर या घटनांना महावितरणला जबाबदार धरत अभियंत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. या घटनेमुळे ओव्हरहेड वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारचा धोका असून, सिडकोसह शहरातील झोपडपट्टी आणि गावठाण भागात ओव्हरहेड वाहिन्या अजूनही मृत्यूच्या सापळा बनून आहेत. परिमंडळात ओव्हरहेड वाहिन्यांमुळे केवळ तीन महिन्यांत तब्बल आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. शहरातील ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत कराव्यात यासाठी महावितरणला पायाभूत विकास आराखड्यातून कोट्यवधींचा निधी प्राप्त झालेला आहे. केवळ याच माध्यमातून नव्हे तर अन्य दोन योजनांमधून महावितरणने भूमिगत वाहिन्यांचे काम सुरू केले आहे. परंतु सदर कामांचे कंत्राट खासगी व्यक्तींना देण्यात आल्यामुळे या कामांना अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांत अपेक्षित कामे झाली नसल्याचे प्रत्यक्ष दिसत असताना कागदोपत्री मात्र कामे प्रगतीवर दाखविली जात आहेत. पायाभूत विकास सुधारणा आराखडा अंतर्गत ५३५ कोटी खर्चाच्या योजनेतून २१९ किलोमीटरची वाहिनी भूमिगत करण्यात आली असून, याच योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ३२५.६ किलोमीटरपैकी ३१६ किलोमीटर वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांतर्गत ३० किलोमीटर केबल भूमिगत करण्यापैकी केवळ अर्धा किलोमीटरचे काम बाकी असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५०.५ किलोमीटरपैकी फक्त २४ किलोमीटर भूमिगत केबलचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना तसेच एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प (आयपीडीएस) या दोन योजनांमधूनही केबल भूमिगत करण्याचे काम प्रस्तावित आहे. यातील काही कामाचे कार्यारंभ आदेशही निघाले आहेत. याचाच अर्थ अजूनही वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला अपेक्षित गती प्राप्त झालेली नाही.