‘समता आली तरच लोकशाही टिकेल’
By admin | Published: November 22, 2015 11:50 PM2015-11-22T23:50:18+5:302015-11-22T23:50:43+5:30
संविधान गौरव महाचर्चा उत्साहात
नाशिक : आर्थिक आणि सामाजिक समता आली तरच देशातील लोकशाही टिकेल असे स्वत: बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. म्हणून सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होण्यासाठी घटनेतील तरतुदी सर्वसामान्यांना समजल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.
भूमिपुत्र सामाजिक संघटनेच्या वतीने हॉटेल रॉयल हेरिटेज येथे आयोजित ‘संविधान गौरव महाचर्चा’ कार्यक्रमप्रसंगी कसबे उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर डॉ. संजय अपरांती, हंसराज वडघुले, मोहन अढांगळे, अजीज पठाण, कविता कर्डक, वंदना अपरांती आदि मान्यवर उपस्थित होते.
घटनेतील तरतुदी आणि माणसांचे हक्क काय आहेत याची माहिती सर्वसामान्यांना समजण्यासाठी चळवळी सतत जागृत ठेवाव्या लागणार आहेत. देशात सामाजिक, आर्थिक समता आणण्यासाठी काय करावे लागेल. याचा विचार अशा विचारमंथनातून पुढे आला पाहिजे, असेही कसबे म्हणाले.
या महाचर्चेसाठी शैक्षणिक क्षेत्रातील गळती, असहिष्णुता, जातीयता, भ्रष्टाचार, आदिवासींचे प्रश्न, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा असे विषय देण्यात आले होते.