द्राक्षबागांवर फळमाश्यांची संक्रांत ..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 00:31 IST2021-01-14T21:43:43+5:302021-01-15T00:31:44+5:30
कसबे सुकेणे : गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे तडे पडलेल्या द्राक्षांना आता फळमाशी प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाला असुन निफाड तालुक्यातील द्राक्षबागायतदारांपुढे संकटाची संक्रांत मात्र कायम आहे.

द्राक्षबागांवर फळमाश्यांची संक्रांत ..!
कसबे सुकेणे : गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे तडे पडलेल्या द्राक्षांना आता फळमाशी प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाला असुन निफाड तालुक्यातील द्राक्षबागायतदारांपुढे संकटाची संक्रांत मात्र कायम आहे.
गत आठवड्यात निफाड तालुक्यात सलग सात दिवस ढगाळ हवामान व दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस झाल्याने परिपक्व व साखर उतरलेल्या द्राक्षांचे अतोनात नुकसान झाले. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने तडे पडलेल्या द्राक्ष बागेत आता फळमाश्या घोंगावत असुन त्यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे द्राक्षउत्पादकांनी सांगितले.
फळमाशी तडे गेलेल्या द्राक्ष मण्यात अंडी घालते, त्यानंतर चार ते पाच दिवसात माश्यांचे प्रमाण वाढते, संपुर्ण द्राक्षबाग फळमाशी नष्ट करते, गतवर्षी ब-याच ठिकाणी फळमाशीमुळे अनेकांच्या बागांना फटका बसला होता, असे कसबे सुकेणे येथील दाभोळकर प्रयोग परीवाराचे द्राक्ष संशोधक शेतकरी वासुदेव काठे यांनी सांगितले. कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, कोकणगाव, थेरगाव, ओणे, दात्याणे जिव्हाळे, शिरसगाव, वडाळी या भागात फळमाशी दिसत असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले
फळमाशी प्रादुर्भाव नियंत्रणासाठी द्राक्षउत्पादकांनी एकरी कमीत कमी वीस ट्रॅप बागेत लावावीत, सुकेणे येथे काठे यांनी त्यांच्या बागेत ट्रॅप लावल्यानंतर फळमाशी त्यामध्ये अडकली जाते व प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येतो , असेही काठे यांनी सांगितले.