पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतरण
By Admin | Published: January 5, 2017 01:28 AM2017-01-05T01:28:39+5:302017-01-05T01:28:53+5:30
बैठक : समिती अध्यक्षपदी घुमरे; उपाध्यक्षपदी सैंद्रे
सिन्नर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची वडांगळीसह १४ गाव पाणीपुरवठा योजना समितीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय पंचायत समितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी सांगवी येथील विनायक हौशिराम घुमरे, तर उपाध्यक्षपदी नवनाथ गयाजी सैंद्रे यांची निवड करण्यात आली.
गटविकास अधिकारी रत्नागर पगार यांच्या अध्यक्षतेखाली व मजीप्राचे उपअभियंता एस.डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेत समाविष्ट असलेल्या १४ गावांतील सदस्यांसोबत बैठक पार पडली. पंचायत समिती सभापती संगीता काटे, उपसभापती राजेंद्र घुमरे, जिल्हा परिषद सदस्य ताईबाई गायकवाड, राजेश नवाळे, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, अलका मुरडनर, मजीप्राचे शाखा अभियंता आर.एच. मिस्त्री व्यासपीठावर उपस्थित होते.
सुमारे वर्षभरापूर्वी पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले असून, यापुढे योजनेची देखभाल व दुरुस्तीचे काम समितीकडे असणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नागर पगार यांनी दिली. पगार यांनी समिती सदस्यांनी योजनेसंबंधी व कर्तव्याची जाणीव करून दिली. या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदी सांगवी येथील विनायक घुमरे, तर उपाध्यक्षपदी नवनाथ सैंद्रे यांची निवड करण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला. समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)