धोक्याचा इशारा देणारे ‘सायरन’ वाजले...
By admin | Published: November 18, 2016 12:35 AM2016-11-18T00:35:29+5:302016-11-18T00:34:33+5:30
‘नासंद’कडून चाचणी : भारत-पाक सीमेवरील तणाव; सायरन व्यवस्था अद्ययावत करण्यास प्रारंभ
अझहर शेख नाशिक
वेळ दहा वाजेची. नाशिककर दैनंदिन कामांसाठी रस्त्यावर आलेले असताना अचानकपणे शहरात ‘सायरन’चा आवाज सुरू होतो. दोन मिनिटांपर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये ऐकू येणाऱ्या आवाजाने नाशिककर अवाक् झाले. शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला काही धोका निर्माण झाला की काय, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली.
एखाद्या शहराला धोका निर्माण झाल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्या शहराला सावधानतेचा इशारा देण्यासाठी विविध मोठ्या शहरांमध्ये शासनाच्या वतीने चार अश्वशक्तीचे सायरन विविध ठिकाणी बसविण्यात आले आहे. नाशिकमध्ये अकरा ठिकाणी भोंगे बसविण्यात आले आहेत. या अकरा भोंग्यांची आज नागरी संरक्षण दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासणी करून चाचणी घेतली. अकरा भोंग्यांपैकी आठ भोंगे सुस्थितीत असल्याचे आढळून आले असून, उर्वरित भोंग्यांची तातडीने देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत-पाक सीमेवर सर्जिकल स्ट्राइकनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या शहरांमधील ‘सायरन सिस्टम’ अद्ययावत करण्याचे आदेश केंद्राने विविध राज्यांना दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तत्काळ नागरी संरक्षण दलाला याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार गुरुवारी नागरी संरक्षण दलाने भोंग्याची अवस्था तपासण्यासाठी पावले उचलत विविध अकरा ठिकाणी भेटी दिल्या.
भोंग्यांची तपासणी करून चाचणी घेण्यात आली. दोन मिनिटांपर्यंत भोंगा वाजवून त्याचा आवाज व क्षमता तपासण्यात आली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून, या शहरामध्ये संरक्षण, चलन मुद्रणाशी संबंधित यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे तत्काळ ‘अलर्ट सायरन’ची तपासणी करून चाचणी घेतली गेली. (प्रतिनिधी)